कोल्हापूर : देशाच्या सीमेवर रक्षण करताना वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी शहीद झालेल्या ऋषीकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात आले आहे. एबीपी माझाच्या बातमीच्या दणक्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रामसेवक राजेंद्र डवरीवर (मुम्मेवाडी ता. आजरा) निलंबनाची कारवाई केली. याबाबत त्यांनी आदेश निर्गमित केला आहे.  



जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यात 13 नोव्हेंबर 2020 रोजी पाकिस्तानी सैन्याशी प्रतिकार करताना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडीमधील ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आले होते. त्या ऋषीकेश यांच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक डवरीकडून नाहक त्रास सुरु होता. डवरीपासून होत असलेल्या छळामुळे वडील रामचंद्र हरी जोंधळे आणि आई कविता यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून ग्रामसेवक डवरींपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. एबीपी माझाने या बातमीची दखल घेतल्यानंतर जिल्हा परिषदेने तातडीने डवरीवर निलंबनाची कारवाई केली आहे. 


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निर्गमित निलंबन आदेशात म्हटले आहे की, एबीपी माझामध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीच्या अनुषंगाने राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी यांनी शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या कुटूंबीयांना नाहक त्रास देवून बदनामी केल्याचे दिसून येते. डवरी हे शासकीय कर्मचारी असून त्यांचे हे कृत्य न शोभणारे असून समाज भावना दुखावणारे आहे. त्यांच्या या कृत्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायत या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेची जनमानसातील प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यांना निलंबनाच्या कालावधीमध्ये कागल पंचायत समितीमध्ये हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


ग्रामसेवक डवरीकडून उर्मट भाषा


ऋषीकेश यांचे वडील रामचंद्र जोंधळे यांना ग्रामसेवक डवरीने तुझ्या मुलाला देशासाठी मरायला कोणी सांगितले होते, असे अपशब्द वापरले होते. ज्या तिरंग्यातून ऋषीकेश यांचे पार्थिव आले होते तो तिरंगा सुद्धा बळजबरीने काढायला लावला होता. किरकोळ वादानंतर डवरीने गावामध्ये बदनामीकारक डिजिटल फलक लावला होता. त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली होती. 


कुटुंबीयांची बदनामी होईल असा फलक


ग्रामसेवक राजेंद्र डवरी प्रेमी मित्र मंडळ असा सौजन्य असलेल्या बोर्डवर राजेंद डवरी भले मोठे कौतुक करणारे शब्द लिहिण्यात आले आहेत. त्या फलकावर राजेंद्र शंकरनाथ डवरी यांच्यावर 1 जून 2022 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास रामचंद्र हरिबा जोंधळे, लक्ष्मण हरिबा जोंधळे, पुंडलि सदाशिव जोंधळे आणि दीपक सदाशिव जोंधळे या चार हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याचे म्हटले आहे. सोबत राजेंद्र डवरी यांचा जखमी असलेला फोटो आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या