Rajya Sabha Election Result : राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला तगडा हादरा तिन्ही उमेदवार निवडून आणले. भाजपच्या संख्याबळानुसार विचार पाहता त्यांचा दोन उमेदवारांचा विजय निश्चित होता. तथापि, महाविकास आघाडीमधील अपक्षांची मते फुटल्याने भाजपकडून धनंजय महाडिक यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. 


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्यासाठी धनंजय महाडिक यांचा विजय विशेष महत्त्वाचा आहे. कारण त्यांना भाजपला कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार व्हावे लागले आहे. त्यामुळे हा विजय जितका उर्जितावस्था महाडिकांना देणारा आहे, तितकाच तो चंद्रकात पाटील यांना सु्द्धा देणारा आहे. चंद्रकांत पाटील यांना विजयावर प्रतिक्रिया भावना अनावर झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे काल चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस होता. त्यामुळे घरच्या मैदानावर विजयाच्या शोधात असलेल्या दादांना वाढदिनी महाडिकांच्या विजयाचे गिफ्ट मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देताना दादांना कोल्हापुरी पैलवान गिफ्ट केल्याचे सांगितले. 



चंद्रकांत पाटील विजयावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, गुर्मी उतरवली असं बोलणे आमच्या संस्कृतीमध्ये नाही, पण मुंगी होऊन साखर खाल्ली पाहिजे हे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळेल. देवेंद्र फडणवीस यांचे उत्तम नियोजन तसेच प्रत्येक आमदाराला दिलेलं काम पूर्ण केलं त्यातून हा विजय झाला आहे. केंद्रीय प्रभारी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैभव यांनीही लहानसहान मुद्यावर मार्ग काढला. त्यांचीही भूमिका विजयात मोठी आहे. मी हा विजय महाराष्ट्रातील जनतेला नम्रपणे अभिवादन करून अर्पण करत आहे.  


धनंजय महाडिक विजयानंतर प्रतिक्रिया देताना काय म्हणाले ?


दुसरीकडे, विजयी झाल्यानंतर धनंजय महाडिक यांनी संपूर्ण विजयाचे श्रेय भाजप आण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यांनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सांगितले की, या विजयाचे फक्त आणि फक्त शिल्पकार कोण असतील ते आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी भाजपची संपूर्ण टीम आहे, यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा, अशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड, दरेकर यांनी कठोर परिश्रम घेतले. त्याचा आपल्याला परिचय या निवडणुकीमध्ये दिसत आहे. 


ते पुढे म्हणाले की, आमच्यासाठी निवडणूक खूपच मोठी आहे, ज्या दिवशी मी अर्ज भरला त्यावेळी सुद्धा मी म्हणालो होतो फडणवीस यांनी संख्याबळाची बेरीज असल्याशिवाय तिसरा उमेदवार जाहीर केला नसता. आम्ही अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही सांगितले होते भाजपचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीकडून अनेकवेळा संख्याबळ सांगण्यात आले, त्यामुळे चारही उमेदवार निवडून यायला हवे होते. देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रणनीती आखली त्यामुळे भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला असून हा ऐतिहासिक विजय आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या