Kolhapur News: औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समुहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह भयावह पद्धतीने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा झालेला प्रयत्न, त्यानंतर माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकारी राहुल राऊतने एक कोटीच्या खंडणीसाठी केलेला मानसिक छळ यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलताना कुटुंबाचा अंत केला आहे. शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. 


या सुसाईड नोटची माहिती मिळताच गडहिंग्लजमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. तसेच जोवर सुसाईड नोटमध्ये नावे असणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोवर मृतदेहांना हात लावणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर पोलिसांनी समज काढून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन केल्यानंतर नंतर सोपस्कार पार पाडण्यात आले. 


माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या 


शिंदे यांनी सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये आत्महत्येसाठी चौघांना दोषी धरावे असे म्हटले आहे. एक कोटीच्या खंडणीसाठी त्रास देणारी माजी नगरसेविका, पोलीस अधिकारी राहुल राऊत तसेच संतोष शिंदे यांच्याकडून साडेसहा कोटी रुपये घेतलेले पुण्यातील विशाल बाणेकर आणि संकेत पाटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. संतोष शिंदे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सुद्धा त्या चौघांची नावे असून आणि माझ्या आत्महत्येला त्यांनाच जबाबदार धरण्यात यावे, असे म्हटले आहे. या संदर्भातील फिर्याद संतोष यांचे नातेवाईक शुभम बाबर यांनी दिली आहे. 


दरम्यान, संतोष शिंदे यांनी ज्या पद्धतीने आयुष्याचा शेवट केला ते पाहून अक्षरशः काळजाचा थरकाप उडाला आहे. त्यांनी आपल्या बेडरूममध्ये आत्महत्या करताना विषप्राशन केले आणि गळ्यावर सुरी ओढून घेतली. त्यामुळे बेडरूममध्ये रक्ताचा सडा पसरला होता, इतकेच नव्हे तर भिंतींवरही रक्ताचे डाग पसरले गेले होते. बेडरूममधे सर्वत्र रक्ताचे डाग आणि फरशीवर रक्ताचे पाट वाहिल्यासारखी परिस्थिती होती. त्यामुळे मुलाने अशा पद्धतीने शेवट केल्याने त्यांच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं आहे.


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार संतोष यांच्यावर महिनाभरापूर्वी कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये त्यांना अटक होऊन वीस ते पंचवीस दिवस कारागृहात काढावी लागलीय. त्यामुळे त्यांना मोठी निराशा आली होती. याचा परिणाम व्यवसायावर सुद्धा झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उद्योग सुरू करण्यासाठी लक्ष दिले. मात्र, निराशा त्यांची पाठ सोडत नव्हती. बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवल्याने त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. 


इतर महत्वाच्या बातम्या