Jalgaon News : आपल्या तान्हुन्याला झोक्यात झोपूवन आई कामावर निघून गेली, तो झोक्यातून पडू नये म्हणून त्याला रुमाल बांधला, मात्र याच रुमालाने चिमुकल्याचा जीव घेतल्याची दुदैवी घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात घडली आहे. निर्भय वसंत इंगळे असे एक वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. दहा दिवसांपूर्वीच निर्भय याचा पहिलाच वाढदिवस (birthday) साजरा झाल्याची माहिती मिळते आहे. 


जळगाव (Jalgaon)  जिल्ह्यातील जामनेर (Jamner) शहरातील गिरीजा कॉलनीत वसंत इंगळे हे पत्नी व कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वसंत इंगळे हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. तर त्यांची पत्नी रुग्णालयात कामाला आहे. गुरुवारी वसंत इंगळे हे सकाळी नेहमीप्रमाणे कामाला निघून गेले. त्यानंतर त्यांची पत्नी हिने कामावर जाण्यापूर्वी मुलगा निर्भय याला दूध पाजले. त्याला झोक्यात झोपविले. निर्भय हा झोक्यातून पडू नये, म्हणून मध्यभागी झोक्याला रुमाल बांधला. त्यानंतर घरात असलेल्या लहान बहिणीला निर्भय यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगून निर्भयची आई रुग्णालयात कामावर निघून गेली. 


जेवण आटोपल्यावर घरात आली तर.... 


दरम्यान निर्भयच्या याच्या मावशीने जेवणापूर्वी झोळीतील निर्भयकडे डोकावून पहिले असता तो झोपेत होता. त्यानंतर जेवण करून परतल्यानंतर पुन्हा निर्भयला पाहण्यासाठी मावशी गेली असता, निर्भय हा झोक्याबाहेर लटकलेला दिसून आला. ते पाहून निर्भयच्या मावशीला धक्काच बसला. तिने तात्काळ निर्भय ला झोक्याबाहेर काढले, मात्र तो हालचाल करीत नसल्याने त्यांनी निर्भयच्या आई-वडीलांना तात्काळ बोलावून घेतले. आई, वडिलांनी तातडीने निर्भय यास जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले असता त्याचा तोपर्यंत निर्भयने प्राण सोडले होते.  


रुग्णालयात आई वडिलांचा हंबरडा 


दरम्यान रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी निधन झाल्याचे सांगताच निर्भयच्या आई वडीलांसह कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. निर्भय पडू नये, यासाठी मध्यभागी रुमाल बांधला. मात्र अचानक जागे झालेल्या बाळाने खाली उतरण्याचा प्रयत्न करताच त्याच्या संरक्षणासाठी बांधलेला रुमालच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. या दुर्दैवी घटनेने गिरीजा कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान दहा दिवसांपूर्वी आनंदी वातावरणात निर्भय याचा पहिलाच वाढदिवस साजरा झाला होता. मात्र तान्हुल्या निर्भयला नियतीने अचानक हिरावून नेल्याने वसंत इंगळे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


मुलांची काळजी घेणं महत्वाचे 


एकीकडे लहान मुले घरात असताना कुटुंब नेहमीच काळजी करत असते. मात्र अनेकदा थोडं दुर्लक्ष झालं तरी अनुचित प्रकार घडतात असतात. त्यामुळे पालकांनी लहान मुलांकडे सजग राहून लक्ष देणे आवश्यक आहे. धकाधकीच्या जीवनात मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. त्यामुळे पालकांनी घर, ऑफिस सांभाळून मुलांकडे देखील लक्ष देणं आवश्यक आहे. अनेकदा वस्तू गिळल्याने, अंगावर पाणी पडल्याने, हौदात पडल्याने, स्विमिंग पूलमध्ये पडून बालकांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पालकांनी सजग राहून मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे.