जळगाव : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला भाजपने (BJP) तयारी दर्शवली होती, पण संजय राऊतांनी (Sanjay Raut) त्यामध्ये खोडा घातला. त्यामुळेच आमचा संजय राऊत यांच्यावर राग आहे असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एबीपी माझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' केलं होतं. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता मंत्री गुलाबमंत्री पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना फुटीदरम्यानच एक किस्सा सांगितला आहे.

  


गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याअगोदर पाचोऱ्यात गुपचूप आले होते. एकनाथ शिंदेंचा अचानक दौरा आला. त्यावेळी देखील मी पाणीपुरवठा मंत्री होतो. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये पाचोरा शहराचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे. किशोर पाटील सर्वात पहिले एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते.  


गुलाबराव पाटलांनी सांगितला किस्सा


मी एकटाच मुंबईत होतो. नंतर लक्षात आलं की सर्व चालले गेले, चार खांदे गेल्यानंतर आग्याने काय करावे? म्हणून मी पण हातात मडकं घेतलं आणि राम बोलो भाई राम म्हणत जे सरकार चुकीचं होतं त्या सरकारचा आम्ही वध केला.  ज्या विचारांना आम्ही प्रेरित झालो त्या शिवसेना-भाजपचे सरकार आम्ही स्थापन केलं, असे त्यांनी म्हटले आहे. 


किशोर पाटील 100 टक्के आमदार होणार


गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, मी भविष्यकार ,ज्योतिष्यकार, साधुसंत नाही. मात्र, निर्धार मेळाव्यात महिलांची उपस्थिती बघून सांगतो की, किशोर पाटील 100 टक्के आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पाचोरा येथील सेनेच्या निर्धार मेळाव्यात गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे. तर आंखें होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने, जिस अंधेरे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लड़ना नहीं मालूम वह तीर कमान क्या जाने,  कौवा कितना भी ऊंचाई पे बैठे वह कबूतर नहीं हो सकता, कौन जीत जाएगा कौन हार जाएगा यह तो वक्त बताएगा, अशी शेरोशायरी करत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला. 


काँग्रेसने पोलिसांच्या माध्यमातून आम्हाला त्रास दिला


दिवंगत शिवसेनेचे आमदार आर ओ तात्या पाटील यांचा सुभाष देसाई यांच्या माध्यमातून मुंबईत शिवसेनेत प्रवेश झाला होता. त्यावेळी किशोर पाटील हे पोलीस होते. पोलीस वाले म्हणजे त्यावेळचे आमचे दुश्मन होते. त्या काळात काँग्रेसने सर्वात जास्त त्रास पोलिसांच्या माध्यमातून द्यायला लावला. पोलिसांची इच्छा नसताना त्यावेळी काँग्रेसच्या माध्यमातून आमच्यावर अन्याय झाला.  त्यावेळी किशोर पाटील हे पोलीस होते आज पोलीस बन गया आमदार, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. 


आणखी वाचा


भाजप पदाधिकाऱ्यांची सेनेच्या निर्धार मेळाव्याला दांडी, गुलाबराव पाटील संतापले, थेट फडणवीस, महाजन अन् शिंदेंकडे तक्रार करणार