Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रीपदाची याचना करत आहेत. यापूर्वी त्यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्यावर बंद खोलीतून मुख्यमंत्रीपदाच्या शब्दाचा आरोप लावला होता. असाच आरोप ते यापुढे शरद पवारांवर (Sharad Pawar) लावतील, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली होती. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला आहे. 


संजय राऊत यांनी आज जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, बदलापूर घटनेत पोलीस अधिकारी दखल घेत नव्हते. शाळा सत्ताधाऱ्यांशी संबधित होती. यात संस्था चालक जबाबदार आहे अस म्हणत नाही, मात्र संस्था बदनाम होईल म्हणून तुम्ही गुन्हा दाखल करत नसाल तर हे गंभीर आहे. पोलीस दखल घेत नाही, हे कठीण आहे. पोलीस सुद्धा यात जबाबदार आहेत. ठाणे पोलीस हे मिंधे गँगचे अधिकारी आहेत. खाकी वर्दीमधील निर्जीव लोक आहेत. खाकी वर्दीमुळे यांना आपण पोलीस म्हणतो, राज्यात पोलिसांना घर गड्यासारखे वागवले जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. 


हा महाराष्ट्रातील पोलिसांचा अपमान 


ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांना केंद्राची सुरक्षा दिली याचा अर्थ राज्यातील पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही. पोलीस महासंचालिका सांगतात की, मी संघाची कार्यकर्ती आहे, मग तुम्ही काय अपेक्षा करणार? राज्यात पोलीस खाते भ्रष्ट झाले आहे. बदल्यांसाठी पैसे द्यावे लागत आहेत. पोलीस विरोधकांना अडकविण्यासाठी वापर केला जात आहे. जो नेता आपला पराभव करण्यासाठी, त्याला अडकवून ठेवण्यासाठी शरद पवार यांना सुरक्षा देण्यात आली असावी. हा महाराष्ट्रातील पोलिसांचा अपमान असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. 


चंद्रशेखर बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस


चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत संजय राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे ही एक राजकारणातली वाया गेलेली केस आहे. त्यांच्या कामटी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष 30 हजारांनी मागे आहे. त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालेला असू शकतो. आम्हाला कोणाचीही याचना करण्याची गरज नाही. आम्ही महाविकास आघाडीची भूमिका मांडली आहे. एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे. बावनकुळे यांनी चौपाटीवर कान साफ करून घ्यावे. काँग्रेस-राष्ट्रवादीने कोणताही उमेदवार द्यावा मी त्याला पाठिंबा देईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. हे बावनकुळे यांना ऐकू येत नसेल तर त्यांनी कानाचे ऑपरेशन करून घ्यावे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.


आणखी वाचा 


Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; काँग्रेसने तीन वाक्यात विषय संपवला, ठाकरेंना भूमिका मान्य होणार?