Sanjay Raut on CM Eknath Shinde : बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आंदोलनाबाबत विरोधकांवर संशय व्यक्त केला. तसेच चार महिन्यापूर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्टट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी एका भाषणात केले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  


संजय राऊत म्हणाले की, आमच्यावर संशय व्यक्त केलाच पाहिजे. कारण या राज्याचा मुख्यमंत्री हा संशयीआत्मा आहे. त्यांचा दिवसातला अर्धा दिवस हा संशयकल्लोळात, जादूटोणा, मंत्र, तंत्र, अंधश्रद्धा या कामात जातो. त्यांनी संशय घेणे हे सहाजिकच आहे. त्यांना कदाचित असेही वाटले असेल की, बदलापुरातील आंदोलनात लाखो लोकं रस्त्यावर उतरली त्यांच्यावरती देखील कोणीतरी जादूटोणा केला असेल. पण, त्यांनी डोळे नीट उघडले तर त्यांना दिसेल की, बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत. तुमचा मुलगा तिथे खासदार आहे. तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलकांच्या भेटीगाठीला देखील जाऊ शकले नाहीत. तुम्ही घाबरलेले होतात. तुम्ही भयग्रस्त होता. तुम्ही म्हणतात ना ठाण्यातली नेतृत्व मी अनेक वर्षापासून करतो. पण, बदलापूरच्या त्या पीडित महिलेची तक्रार घ्यायला पोलीस दहा तास तयार नव्हते. हे काय विरोधकांनी केले का? त्या लहान मुलीची आई दहा तास वणवण फिरत होती त्यात विरोधकांचा काय दोष आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.


मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? 


ते पुढे म्हणाले की, तुम्ही पाहिलं असेल काल मुख्यमंत्र्यांची बदलापूरच्या घटनेनंतर एक क्लिप व्हायरल झाली. मुख्यमंत्री असं सांगत आहे की, महाराष्ट्रात अशीच घटना घडली. पण, आम्ही ती फास्टट्रॅकवर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी दिली. माझा असा प्रश्न आहे की, मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली? कोणत्या न्यायालयासमोर हा घटना चालला? कोणत्या न्यायालयाने संबंधित आरोपीला फासावर लटकवले? कोणत्या कारागृहात या आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली? यातला तपशील जाहीर करणे गरजेचे आहे.


संजय राऊतांचं राज्यपालांना आव्हान


फाशीची जागा त्यांनी सांगावी. वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली. एखाद्या राज्यात जर कोणाला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते. राज्यपालांचा आदेश काढावा लागतो. महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझे आव्हान आहे की, मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य त्यांनी गांभीर्याने घ्यावे आणि परस्पर मुख्यमंत्र्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी आणि तुमच्याकडे जर काही अशी नोंद असेल तर तुम्ही ते महाराष्ट्र समोर आणावे. हे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. त्यांनी महाराष्ट्राला मूर्ख समजलं आहे का? महाराष्ट्रात ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत. काल पुण्यामध्ये घडले, अकोल्यात घडले, काय करत आहेत मुख्यमंत्री? अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 


आणखी वाचा 


Badlapur Crime: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची खरंच तीन लग्न झालीत का? वडिलांचा खळबळजनक दावा, म्हणाले...