Agriculture News : सध्या केळी (Banana) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या महिनाभरात केळीचे दर 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल घसरल्यानं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. बाजार समितीत मिळणाऱ्या दरापेक्षा व्यापारी निम्म्या भावानं केळी खरेदी करत आहेत. त्यामुळं सरकारनं केळीला हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. 


मागील दोन महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यात केळीच्या दरानं उच्चांक गाठत तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, गेल्या महिनाभरात केळीचं दर 400 ते 500 रुपये प्रति क्विंटलवर घसरल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. जळगाव जिल्हा हा संपूर्ण देशभरात केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे. जळगावची अर्थव्यवसथा ही केळीवर अवलंबून आहे.


केळीचा उत्पादन खर्च वाढला


कधी अवकाळी पाऊस, कधी चक्रीवादळ तर कधी केळीच्या दरात घसरण होत आहे. अशा अनेक संकटांची मालिका केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे सातत्याने येत आहे. त्यामुळं केळी उत्पादक शेतकरी चांगलेच त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यात कधी नव्हे ते केळीच्या दरान उच्चांक गाठला होता. तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यानं शेतकरी वर्ग खुश असल्याचं दिसत होते. मागील महिन्यापासून मात्र केळीच्या दरात मोठी घसरण होऊन केळीचे दर हे पाचशे ते सहाशे रुपये इतक्या नीचांकी पातळीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक शेतकरी हे व्यापाऱ्यांना दोष देत असून, व्यापारी एकी करुन भाव पाडत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या केळी पिकावर होणारा वाढता खर्च पाहता, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळीचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळं केळीला किमान दोन हजार रुपयांचा हमीभाव द्यावा अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.


केळीपेक्षा आब्यांची मागणी वाढली


सध्या संपूर्ण देशभर उष्णतेची लाट सुरु असल्यानं केळीची मागणी कमी झाली आहे. शिवाय या वाढत्या तापमानात केळी झाडावर पिकण्याचे प्रमाण वाढल्यानं अशी केळी बाजार पेठेत विक्रीसाठी आणने आणि देशभर पाठवणे शक्य होत नाही. त्यात भरीस भर म्हणून यंदा मोठ्या प्रमाणत आंब्याचे उत्पादन झाल्यानं आंब्याचे दरही अतिशय निचांकी पातळीवर असल्यानं केळीपेक्षा आंब्याला खरेदीसाठी ग्राहक प्राधान्य देत आहेत. त्याचा परिणाम हा केळीच्या मागणीवर झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. उष्णतेने केळीची गुणवत्ता कमी होऊन केळी खराब झाल्यानं त्याचा परिणाम देखील केळीच्या दरावर झाला असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या:


केळी आणि पपई पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत