Jalgaon News: जळगाव : गेल्या आठ दिवसापासून जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यात विविध कारणांनी मृत पावलेले 50 मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. यातील सोळा मृतदेह हे बेवारस असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. ज्या व्यक्तींचे मृतदेह आहे, विविध आजारांनी ग्रस्त आहेत. त्यात उन्हाच्या तीव्रतेने हे मृत पावली असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 


गेल्या आठ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात विविध कारणांनी तब्बल 50 व्यक्तींचा मृत्यू झाला. आठच दिवसांत पन्नास मृतदेह जळगावातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, यातील सोळा मृतदेह बेवारस असल्याचं सांगितलं जात आहे. जळगाव जिल्ह्याच्या विविध भागांत आढळून आलेले हे सर्व मृतदेह पोलिसांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागृहात दाखल करण्यात आली आहे. यासर्व मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. विविध आजारांनी ग्रस्त असलेले आणि रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यानं यासर्व व्यक्तींचा उन्हाच्या तीव्रतेनं मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व मृतदेहांवर मंत्री गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याच बरोबर रस्त्यावर असलेल्या बेवारस नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


राज्याचा पार दिवसेंदिवस वाढताच, उष्णतेनं अनेकांनी गमावले प्राण 


राज्यात मोठ्याप्रमाणावर तापमानाचा पारा वाढलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अकोला आणि जळगावात वाढत्या तापमानामुळे 3 जूनपर्यंत जमावबंदी लावण्यात आला आहे. मालेगावात तापमानाचा पारा 43 अंश सेल्सियसपर्यंत वाढला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर यवतमाळमध्येही विक्रमी तापमानाची नोंद झाली असून पारा 45 अंशांच्या पार गेला आहे. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.