जळगाव : नवाब मलिकांचे (Nawab Malik) दाऊद बरोबर संबंध असल्याने ते देशद्रोही आहेत. त्यामुळे ते आमच्यात कधीही राहू शकत नाही. अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिलीये. नवाब मलिकांना सत्तेत स्थापन न करुन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. तसेच यावर राजकीय वर्तुळातून देखील बऱ्याच प्रतिक्रिया उमटत होत्या. यावर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी देखील भाष्य केलं आहे. नवाब मलिक यांना चालत नाही मग प्रफुल पटेल (Praful Patel) कसे चालतात अशी टीका ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर मलिक कोणाच्या बाजूने जाणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. पण हिवाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी मलिक हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाऊन बसले आणि या प्रश्नांना काहीसा पूर्णविराम देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पण त्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आणि जोपर्यंत मलिकांचे आरोप हे खोटे आहेत, हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना महायुतीमध्ये सामील न करुन घेण्याची विनंती केली. दरम्यान या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली. 


गिरीश महाजनांनी काय म्हटलं? 


प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये मोठा फरक आहे. नवाब मलिक यांचे संबंध दाऊद सोबत होते. त्यामुळे ते देशद्रोही आहेत. देशद्रोही आमच्यासोबत कधीच राहू शकत नाही. मलिकांनी दाऊदशी संबंध ठेवले, मनी लॉड्रींग केलं. ते नवाब मलिक आमच्यासोबत येऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया देत गिरीश महाजांनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. 


संजय राऊतांनी काय म्हटलं?


यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापण्याची शक्यता आहे आणि त्याला कारण आहे ते म्हणजे नवाब मलिक . मलिक जेव्हा त्या सत्ताधारी बाकावर बसले तेव्हा विरोधकांकडून टीकेची झोड उठली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांनी मलिकांना पेढा भरवतानाचा फोटो ट्वीट केलाय. तसंच मलिकांपेक्षाही भयंकर अपराधाचे आरोप असलेले मंत्री कॅबिनेटमध्ये' येतात अशी प्रतिक्रियाही राऊतांनी दिली. प्रफुल्ल पटेल चालतात पण मलिक का चालत नाहीत असा सवाल राऊतांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. 


हेही वाचा :


राज्यात घाशीराम कोतवालांचं राज्य, तीन घाशीराम कोतवाल राज्य करतायत, खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका