नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा आता मागे घेतला जाणार नाही, असं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विटरवरुन राहुल गांधींना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आहे.


राजीनाम्याबद्दल यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे, असंही राहुल गांधींनी नमुद केलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांकडून राजीनामा मागे घेण्यासाठी मनधरणी सुरु आहे. पण त्याला अद्याप यश आलेलं नाही.

आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत राहुल गांधींनी बैठक केली. या बैठकीच्या निमित्तानं सर्व मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं अशीही विनंती केली. पण या दबावाला राहुल गांधी बळी पडण्याची शक्यता कमी आहे. कुठल्याही परिस्थितीत ते आपला निर्णय मागे घेणार नाहीत असं त्यांच्या वर्तुळातले काही नेते देखील सांगत आहेत.

दरम्यान, आजच्या बैठकीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बैठकीत चांगली चर्चा झाल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. निवडणुकांमध्ये जय-पराजय होतच असतात. राहुल गांधी योग्य निर्णय घेतील, असेही गहलोत म्हणाले.

एकीकडे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ राजीनाम्याचं सत्र सुरु झालं आहे. नाना पटोले यांनी अखिल भारतीय किसान काँग्रेस सभेचा राजीनामा दिला आहे. तर नितीन राऊत यांनीही अनुसुचित जाती सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. इतरही काही पदाधिकारी राजीनामे देत आहेत. तर दुसरीकडे काहींनी आज काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेरच उपोषण सुरु केलं. राहुल यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं हे सांगून आपली निष्ठा दाखवण्यासाठी जणू स्पर्धाच सुरु आहे.