पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा आता गुजरात पुरताच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता मुंबई ते अहमदाबादऐवजी, अहमदाबाद ते बिलिमोरापर्यंतच बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा राबवला जाईल.


महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहणात खूप अडचणी येत आहेत. विशेषत: पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक शेतजमिनी देण्यास सातत्याने विरोध केला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणासाठी डिसेंबर 2018 पर्यंतची मुदत ठरवण्यात आली आहे. मात्र आजवर आवश्यक जमिनीचे अधिग्रहण होऊ शकलेले नाही.

शिवाय निवडणूक तोंडावर आली असताना सक्तीने अधिग्रहण करण्याचे पाऊल उचलले जाणं अवघड मानलं जातं आहे. त्यामुळे पालघरमधील शेतकऱ्यांनी सध्या तरी आपल्या जमिनी वाचल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

आम्ही मुदतीत अधिग्रहण करु आणि प्रकल्पाला वेळेत सुरु करु, सध्या तरी दोन टप्प्यात प्रकल्पाचा विचार नाही, असं बुलेट ट्रेन प्रकल्प राबवणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरशनच्यावतीने सांगितलं आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 2022 रोजी बिलिमोरा ते अहमदाबाद या पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनीच ही डेडलाईन निश्चित केली आहे.

प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गावर 12 स्थानकं (बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, साबरमती आणि अहमदाबाद)
होती. त्यापैकी चार स्टेशन महाराष्ट्रात होते तर उर्वरित आठ स्टेशन गुजरातमध्ये होते. परंतु आता हा प्रकल्प गुजरातपुरताच मर्यादित असल्याने महाराष्ट्रातील बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर ही स्थानकांचा यात समावेश नसेल.