मुंबई: यूपी आणि बिहारचे लोक तामिळनाडूत येतात आणि ते रस्ते सफाईचे आणि शौचालय सफाईचे काम करतात असं वादग्रस्त वक्तव्य तामिळनाडूचे खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर उत्तर भारतातून निषेधाची प्रतिक्रिया येत आहे. तसेच भाजपनेही त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. 


तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रमुकचे (DMK) खासदार दयानिधी मारन यांनी उत्तर भारतीयांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील हिंदी भाषिक लोक तामिळनाडूत येतात आणि बांधकाम कामगार म्हणून काम करतात किंवा रस्ते आणि शौचालये साफ करतात. 


कोण आहेत दयानिधी मारन? (Who Is Dayanidhi Maran) 


दयानिधी मारन हे तामिळनाडूचे प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. ते तामिळनाडूतून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. दयानिधी मारन द्रविड मुनेत्र कळघमचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा जन्म जहागीर येथे झाला. मारन यांना राजकारणाचा वारसा असून त्यांचे वडील मुरासोली मारन हे 36 वर्षे केंद्रात खासदार आणि मंत्री होते. तर त्यांचे आजोबा एम करुणानिधी यांच्या द्रमुकचे अध्यक्ष होते.


भाजपची इंडिया आघाडीवर टीका


दयानिधी मारन यांच्या वक्तव्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. मारन यांच्यावर चहूबाजूंनी हल्ला होत आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही दयानिधी मारन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. यासोबतच त्यांनी इंडिया आघाडीलाही धारेवर धरले. अहंकारी लोक आणि 'घमंडी' युतीला संपूर्ण देश उत्तर देईल आणि त्यांना तामिळनाडूतही प्रत्युत्तर मिळेल, असे ते म्हणाले.


तेजस्वी यादव यांनी या वक्तव्याचा निषेध केला


बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, करुणानिधींचा पक्ष द्रमुक आहे. द्रमुकचा सामाजिक न्यायावर विश्वास आहे. अशा स्थितीत त्या पक्षाच्या नेत्यांनी यूपी आणि बिहारच्या जनतेबद्दल अशी वक्तव्यं केली तर ते अत्यंत निषेधार्ह आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी अशी वक्तव्यं टाळावीत. बिहारचे लोक इतर प्रदेशातील लोकांचा आदर करतात, त्यामुळे आम्हालाही अशीच अपेक्षा आहे. संपूर्ण देशात बिहार आणि यूपीच्या लोकांची मागणी आहे आणि ती पूर्ण न झाल्यास शहरातील लोकांचे जीवन ठप्प होईल.


जात, भाषा, धर्माच्या नावावर देशाची फाळणी


दयानिधी मारन यांच्या उत्तर भारतीयांबाबतच्या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते पूनावाला यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. या वक्तव्यावर टीका करत त्यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना पूनावाला म्हणाले की, इंडिया आघाडी जात, भाषा आणि धर्माच्या नावावर देशातील लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे. यासोबतच त्यांनी नितीश कुमार, तेजस्वी यादव, लालू यादव, काँग्रेस, सपा, अखिलेश यादव यांच्या मौनावरही प्रश्न उपस्थित केले.


यापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. यावरून मोठा गदारोळ झाला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने याच मुद्द्याचे भांडवल केले होते.


ही बातमी वाचा: