पाटणा : चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला.


चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले आहेत. यातील एका खटल्यात 2013 साली लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते काही काळ निवडणुकीच्या राजकारणातून दूर झाले. त्या खटल्यात पाच वर्षांची शिक्षा झाली असली, तरी ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.

1990 मध्ये चारा घोटाळ्याला सुरुवात

चारा घोटाळ्याला 1990 साली सुरुवात झाली होती. त्यावेळी लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. बिहारचे पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता.

या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरु आहेत. चाईंबासा खटल्यात लालूप्रसाद यादव यांना 2013 साली पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र जामिनावर ते बाहेर आहेत.

आरोपी कोण आहेत?

चारा घोटाळ्यात एकूण 38 आरोपी होते. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह माजी मुख्यमंत्री जन्नाथ मिश्रा, बिहारचे माजी मंत्री विद्यासगर निषाद, पीएसीचे तत्कालनी अध्यक्ष जगदीश शर्मा आणि ध्रुव भगत, आर. के. राणा, तीन आयएएस अधिकारी, फूलचंद सिंह, बेक ज्युलिएस उर्फ महेश प्रसाद, एस के भट्टाचार्य, पशू चिकित्सक डॉ. के. के. प्रसाद आणि इतर चार आरोपींचा समावेश होता.

यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला. तिघेजण सीबीआयचे साक्षीदार बनले आणि आपला गुन्हा मान्य केला होता. त्यानंतर त्या तिघांनाही 2006-07 मध्ये शिक्षा सुनावली गेली. त्यामुळे आता एकूण 22 आरोपींविरोधात रांची कोर्टात निर्णय दिला जाणार आहे.

चारा घोटाळ्याचा घटनाक्रम

चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे.

  • 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला. या घोटाळ्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा मुख्य आरोपी बनवलं गेलं.

  • 10 मे 1997 रोजी सीबीआयने तत्कालीन राज्यपालांकडे मागणी केली की, लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई व्हावी.

  • 23 जून 1997 रोजी लालूप्रसाद यादव आणि इतर 55 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

  • 29 जुलै 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांना अटक करण्यात आली होती.

  • 12 डिसेंबर 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांची सुटका झाली.

  • 28 ऑक्टोबर 1998 रोजी पुन्हा अटक करण्यात आली.

  • मार्च 2012 रोजी सीबीआयने पाटणा कोर्टात लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 32 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

  • 2013 मध्ये चारा घोटाळ्याशी संबंधित चाईंबासा प्रकरणात त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.


चारा घोटाळा समोर आणणारे सध्या झारखंडमध्ये मंत्री

चारा घोटाळा ज्यांनी पुराव्यानिशी समोर आणला, ते याचिकाकर्ते सरयू राय हे सध्या झारखंडमध्ये मंत्री आहेत. सरयू राय यांना कधीकाळी वाटलंही नव्हतं की, चारा घोटाळा इतकं मोठं रुप घेईल आणि त्यात लालूप्रसाद यादवांना तुरुंगवासाची शिक्षा होईल.

सरयू राय हे सध्या झारखंडमधील भाजप सरकारमध्ये संसदीय कामकाज मंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री आहेत. 2014 साली ते पश्चिम जमशेदपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. चारा घोटाळा बाहेर काढल्याने ते प्रकाशझोतात आले होते.

सर्व खटले एकत्रित चालवण्यास कोर्टाचा नकार

चारा घोटाळ्याशी संबंधित सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी व्हावी, अशी याचिका लालूप्रसाद यादव यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र कोर्टाने याचिका फेटाळली आणि प्रत्येक खटला स्वतंत्रपणे चालवण्याचे आदेश दिले.

आज कोणत्या प्रकरणात निर्णय येणार?

देवघर तिजोरीतून अवैधरित्या 90 लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात आज निर्णय सुनावला जाणार आहे. लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्र यांच्यासह एकूण 22 आरोपी या प्रकरणात आहेत. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आज अंतिम निकालाची अपेक्षा आहे.