गेल्या काही दिवसांपासून भारतात वेगवगेळ्या ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडतायेत. ही ढगफुटी म्हणजे नेमकं काय ? हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. मान्सून महिन्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी धोकादायक घटना घडतात. पूर, भूस्खलन, दरड कोसळणे आणि ढगफुटी यासारख्या घटनांचा यामध्ये समावेश आहे.



अलीकडेच जम्मूमध्ये ढगफुटीची घटना घडली. सोबत हिमाचल प्रदेश आणि लडाखमध्येही ढगफुटी झाली. अनेक लोकांचा बळीही गेला. क्लाऊडबर्स्ट अर्थात ढगफुटीच्या या घटनांमध्ये अशी वाढ होणे हा एकच चिंतेचा विषय बनला. याबाबत तज्ज्ञांना विचारलं असता, त्याचं म्हणण्यानुसार, अशा आपत्तीचा अंदाज लावणे कठीण असतं कारण ही घटना बहुतेक स्थानिक पातळीवर घडते, बहुधा डोंगराळ भागात घडत असते.

ढगफुटी म्हणजे प्रत्यक्षात अचानकपणे जोरदार मुसळधार पाऊस पडतो. यावेळी दिसताना असं दिसतं की पाऊस पडत नाही पण आकाशातून एखादी टाकी फुटली आहे की काय असं वाटतं आणि म्हणूनच त्याला ढग फुटणे किंवा ढगफुटी असं म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या सांगायचं तर एखाद्या भागात तासाभरात १० सेमीपेक्षा जास्त पाऊस पडला तर ढगफुटी मानली जाते.

यामुळे काय नुकसान होतं?

ढगफुटीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे केवळ मानवांनाच हानी पोहचते असं नव्हे, तर मालमत्तेचंही मोठं नुकसान होतं. डोंगराळ भागात या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने भूस्खलनाच्या घटनांची शक्यता वाढते. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणतात की, ढगफुटी ही अत्यंत लहान-मोठी घटना आहे आणि मुख्यतः हिमालय किंवा पश्चिम घाटाच्या पर्वतीय भागांमध्ये ही आढळून येते.

ढग फुटतात तरी कसे?

जेव्हा उबदार मान्सून वारे थंड वाऱ्यांशी संवाद साधतात तेव्हा हे वारे खूप मोठे ढग तयार करतात.हे लँडफॉर्म आणि पर्वतीय घटकांमुळेसुद्धा असं होऊ शकतं. स्कायमेट वेदर येथील हवामानशास्त्र आणि हवामान बदलाचे उपाध्यक्ष महेश पलावत म्हणतात की कम्युलोनिम्बस म्हणजेच वादळी ढग नावाचे ढग 13-14 किलोमीटरपर्यंत उंची गाठू शकतात.

ढगफुटीचा अंदाज का कठीण ?

कारण ज्या ठिकाणी वारा वाहू शकत नाही अशा क्षेत्रावर हे ढग अडकले, तर ते जोरदार पाऊस पडतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वेबसाइटनुसार ढग फुटण्याच्या अशा घटनांचा अंदाज वर्तविणे फार कठीण आहे. कारण ठिकाण आणि वेळेच्या दृष्टीने ही खूप छोटी घटना आहे.

अंदाज करणे अशक्यही नाही

काही तास अगोदर क्लाउडबर्स्ट इव्हेंटचं निरीक्षण आणि अंदाज करण्यासाठी अशा भागात खूप दाट रडार नेटवर्क आवश्यक आहे. यासाठी खूप उच्च रिझोल्यूशन हवामान अंदाज मॉडेल आवश्यक आहे. विशेष म्हणजे, मैदानी भागातही ढगफुटी होते, पण ते अपवाद आहेत. या महिन्यात जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशही घटना घडल्या आहेत. कोकणातही ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत पण याची कारणं वेगळी आहेत. हे सर्व डोंगराळ भाग आहेत.

यासाठी रडारची गरज आहे

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम राजीवन म्हणतात की या घटनांचा अंदाज तीन तास अगोदर दिला जाऊ शकतो. रडार सर्वत्र बसवता येत नाही, मग देशात रडारची संख्या खूप कमी आहे आणि ती वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या संपूर्ण हिमालयात फक्त सात रडार आहेत.

भारतात ढगफुटी प्रमाण का वाढतंय?



याबाबत हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी एबीपी माझाला माहिती दिली की, जम्मू-काश्मीरमध्ये जो काही बर्फ पडतो किंवा पाऊस पडतो तो पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात नैऋत्य आणि पश्चिमवाऱ्यांचा संयोग होऊन या घटना घडतात. प्रभुणे यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या प्रोजेक्ट मेघदूतच्या माध्यमातून त्यांनी हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंडमध्ये त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला होता त्यावेळी स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या १० ते १२ वर्षांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

 

पूर्वी मान्सूनचा पाऊस या भागात कमी व्हायचा, परंतू गेल्या काही वर्षात मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे या भागातलं चक्र बदललं आहे आणि मान्सूनचे वारे अगदी आतपर्यंत पोहोचू लागले आहेत. त्यामुळे इथे ढगफुटी होण्याचं प्रमाण वाढीस लागल्याचं प्रभुणे सांगतात आणि याचा परिणाम हा तिथल्या लोकांच्या शेतीच्या पीक नियोजनावर झाल्याचंही प्रभुणेंच्या निरीक्षणातून समोर आलं आहे.

 

पण या सगळ्यानंतर असा प्रश्न उपस्थित होत आहे की अचानक देशात ढगफुटीच्या घटनांमध्ये वाढ का होताना दिसते? यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत. परंतु अशा घटना वर्षभर आणि एका हंगामातही दीर्घकाळ दिसत नाहीत. पावसाळ्यामध्येच त्यांची घटना होण्याची शक्यता आधीच जास्त आहे. अशा अनेक घटना शोधून काढल्या जातात, ज्या केवळ एका ठिकाणी मुसळधार पाऊस म्हणून नोंदवल्या जातात. परंतु त्यांच्या वाढीचे एक कारण मान्सूनची असामान्यता आणि अनियमितता देखील असू शकते.