India This Week: सरत्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काही दिलासा देणाऱ्या तर काही अंगावर शहारे आणणाऱ्या. काही थरकाप उडवणाऱ्या तर काही आनंद देणाऱ्या. खरंतर सरता आठवडा इतर घडामोडींसोबतच राजकीय घडामोडींना गाजला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तपणे घेऊन आलोय...


त्र्यंबक प्रकरणाची गृहमंत्री फडणवीसांकडून दखल, एसआयटी चौकशीचे आदेश


 नाशिकमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लीम समाजाच्या काही जणांनी मंदिरात प्रवेश करण्यावरुन वाद झाला. साहजिकच त्याचे पडसादही उमटले. राजकारण अर्थातच ओघानेच आलं. पोलिसांत गुन्हेही दाखल झालेत. मुस्लीम समाजाकडून त्र्यंबकेश्वराला उदी वाहण्याची परंपरा असल्याचा दावा करण्यात येतोय. तिकडे आखाडा परिषदेनेही या वादात उडी घेत मुस्लीम समाजाचा दावा तपासण्याचा निर्णय जाहीर केलाय. मात्र त्यासाठी ते मुस्लीम समाजातील कुणाचाही साक्ष घेणार नाहीत. तसं राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णयही जाहीर केलाय. ( 15 मे वाचा सविस्तर)


तुळजाभवानी मंदिर संस्थानचा भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न


 तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात मंदिर व्यवस्थापनाने जारी केलेला फतवा.. बरं हा फतवा काही तासांतच मागे घेण्याची वेळ प्रशासनावर आली. हा फतवा होता, दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणं टाळण्याविषयीचा.. पण त्यावर सर्व स्तरातून टीका झाल्यावर मंदिर समितीने हा तुघलकी फतवा मागे घेतला. (  17 मे वाचा सविस्तर)


बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाकडून कायमचं अभय, महाराष्ट्र सरकारनं केलेला कायदा वैध


सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वाचा निकाल या आठवड्यात आला. राज्यातील ग्रामसंस्कृतीचा महत्वाचा भाग असलेल्या बैलगाडा शर्यती वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यतींसाठी कायदा संमत केला होता. त्या कायद्याच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब झालं. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक आणि तामिळनाडूमधील अशा प्रकारच्या स्थानिक परंपरांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ( 17 मे वाचा सविस्तर  )


येणारी 5 वर्ष भयंकर उकाड्याची; संयुक्त राष्ट्राचा इशारा 


येत्या पाच वर्षांत जागतिक तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 2023 ते 2027 या काळात कमाल उष्णता कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पाच वर्षांत एक असं वर्षही असेल जे 2016 च्या तापमानाचा विक्रम मोडणारं वर्ष ठरेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. युनायटेड नेशन्सच्या जागतिक हवामान संघटनेनं म्हटलं आहे की, जागतिक तापमान लवकरच पॅरिस हवामान करारामध्ये निश्चित केलेल्या तापमानाची मर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे. (18 मे वाचा सविस्तर)


सिद्धरामय्या यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान 


 शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा शपथविधी पार पडला. डीके शिवकुमार हे या विजयाचे शिल्पकार आहेत, हे सांगायला कुणा विश्लेषकाची आवश्यकता नाही. मोदी लाटेत काँग्रेस नेते भाजपमध्ये सामील होत असताना त्यांनी एकहाती कर्नाटकातील काँग्रेस वाढवली आणि निवडणुकीत विजय मिळवून दिला. कर्नाटकातील विजयात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही मोठा वाटा आहे, हे नाकारुन चालणार नाही.  कर्नाटकातील विजयाचा महाराष्ट्रातील काँग्रेसवरही सकारात्मक परिणाम झालेला दिसतोय.  (20 मे वाचा सविस्तर)