Viral News: प्रेमासाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदरची (Seema Haider) आज देशभरात चर्चा सुरू आहे. अशातच आता भारतातील एक महिलेनं फेसबुकवरील तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानची अंजू (Anju) ही सोशल मीडियावरील प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये पोहोचली आहे. एकीकडे भारत-पाकिस्तानमध्ये सातत्याने तणावाची स्थिती निर्माण होत असताना या दोन देशांतील प्रेमप्रकरणं ही चर्चेचा विषय ठरत आहेत.


पती आणि मुलांना सोडून प्रियकरासाठी गाठलं पाकिस्तान


पाकिस्तानी महिला सीमा हैदर ही तिच्या मुलांसह प्रेमाखातर ग्रेट नोएडाला पोहोचली. त्याचवेळी राजस्थानमधील (Rajasthan) अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू ही प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचल्याचं समोर आलं आहे. अंजू पती आणि मुलांना सोडून पाकिस्तानात पोहोचली आहे. लाहोरमध्ये राहत असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी तिने पाकिस्तान गाठलं.


अंजूच्या पतीला तिच्या प्रियकराबाबत माहितही नाही


मूळच्या मध्य प्रदेशातील असलेल्या अंजूचा विवाह 2007 मध्ये उत्तर प्रदेशमधील अरविंदसोबत झाला. ती पतीसोबत राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात राहते. ती पाकिस्तानात पोहोचल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक अंजूच्या घरी दाखल झालं. पोलिसांनी तिच्या पतीकडे चौकशी केली असता त्याला याबाबतची कल्पना नव्हती. पण अंजू दोन-तीन दिवसांत घरी परतेल, असं त्याचं म्हणणं आहे.


पतीला सांगितलं - मी सहलीसाठी जयपूरला जाते


अंजूचा पती अरविंदने सांगितलं, अंजू चार दिवसांपूर्वी सहलीसाठी जयपूरला जाते सांगून घरातून निघाली होती. त्यानंतर ती नक्की कुठे गेली याची माहिती नाही, पण काही दिवसांत ती परत येईल असा विश्वास अंजूच्या पतीने व्यक्त केला. अरविंदच्या म्हणण्यानुसार, अंजू Whatsapp कॉलिंगद्वारे सतत त्याच्या संपर्कात असते. रविवारीही तिने  Whatsapp कॉल केला होता.


अंजूचा पती हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे. 2007 पासून तो पत्नीबरोबर राज्स्थानच्या भिवडीतील टेरा प्रौढ सोसायटीत भाड्याने राहतो. भिवडीत तो डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करतो. तर त्याची पत्नी अंजू ही होंडा कंपनीत काम करते. अंजूने हिंदू धर्म स्वीकारला होता आणि नंतर तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. अंजूला दोन मुलं देखील आहेत.


पोलिसांकडून तपास सुरू


अंजू ही पाकिस्तानातील लाहोरमध्ये राहणाऱ्या तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत होती. त्याला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. मात्र ती पाकिस्तानात कशी पोहोचली, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, अंजू नावाची भारतीय महिला लाहोरला खैबर पख्तून परिसरात नसरुल्लाह नावाच्या तरुणासोबत राहत असल्याचं पत्र मिळालं आहे. यासंदर्भात महिलेशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसाकडून या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू आहे.


अंजू पाकिस्तानात नेमकी पोहोचली कशी?


अंजूचा प्रियकर नसरुल्ला खैबर हा पाकिस्तानमधील पख्तूनख्वाच्या दीर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. अंजू आणि नसरुल्लाह यांची फेसबुकवर मैत्री झाली आणि दोघेही तासनतास सोशल मीडियावर बोलू लागले. यानंतर अंजूने नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानला जायचं ठरवलं. घरी जयपूरला सहलीला जात असल्याचं सांगून अंजू पाकिस्तानात पोहोचली असल्याचं सांगण्यात येत आहे.


व्हिजिट व्हिसाद्वारे अंजू पाकिस्तानात


अंजूच्या पासपोर्टवरील नोंदीवरून, ती  21 जुलैला व्हिजिट व्हिसावर पाकिस्तानला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय महिला पाकिस्तानात पोहचल्याने पाकिस्तानी एजन्सी अलर्ट झाली आहे. अंजू पाकिस्तानात का आली, याबाबत पाकिस्तानी यंत्रणेकडून चौकशी करण्यात आली आहे. अंजूने नसरुल्लाह याला भेटण्यासाठी आल्याचं सांगितलं आहे. नसरुल्लाह हा दीर जिल्ह्यात मेडिकल रिप्रेझेनटेटिव्ह म्हणून काम करतो.


सीमा हैदरची देखील चौकशी सुरू


पाकिस्तानी महिला सीमा हैदरची भारताच्या नोएडा येथील सचिनबरोबर पब्जी खेळत असताना मैत्री झाली. प्रियकराला भेटण्यासाठी सीमा हैदरने चार मुलांसह नेपाळमधून अनधिकृतपणे भारतात प्रवेश केला. सीमाकडे संशयास्पद चार पासपोर्ट आणि मोबाईल आढळल्याने एटीएसने सीमाची तब्बल आठ तास चौकशी केली. सीमाने कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. चार मुलांची आई असलेल्या सीमाला पबजी खेळण्यास वेळ कसा मिळाला? आणि अवगत तंत्रज्ञान तिला कसं माहित? याबद्दल सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत.


हेही वाचा:


Manipur Violence: मणिपूर पोलिसांना पुराव्यांसह मिळाला 'तो' मोबाईल; ज्यात महिलांच्या विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ...