नवी दिल्ली : गोरखपूरमधील 36 मुलांच्या मृत्यूसाठी ऑक्सिजनची कमतरतेचं कारण नसल्याचा दावा उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी शनिवारी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी गेल्या काही वर्षांमधील ऑगस्ट महिन्यातील मुलांच्या मृत्यूची आकडेवारीही सादर केली. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणी मौन सोडत, माध्यमांवर आगपाखड केली आहे.


गोरखपूरमधील मुलांच्या मृत्यूसाठी ऑक्सिजनची कमतरता करणीभूत नसल्याचं सांगताना, आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, ''दरवर्षीच ऑगस्ट महिन्यात मुलांचा मृत्यू होतो. 2014 च्या ऑगस्ट महिन्यातही अशाच प्रकारे मुलांचा मृत्यू झाला होता.''

दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणावरुन माध्यमांवर आगपाखड केली आहे. माध्यमांवर टीका करताना, योगी आदित्यनाथ म्हणाले की, ''मीडियाने या घटनेमागील खरे तथ्य जनतेसमोर मांडली पाहिजेत. तुम्ही जर खरी आकडेवारी सादर केली, तर ही खरी मानवतेची सेवा होईल.''

गोरखपूरमधील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ''9 ऑगस्ट रोजी मी बीआरडी मेडिकल कॉलेजची पाहाणी केली. तिथे डेंग्यू, स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचारासाठी स्थानिक प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यावेळी ऑक्सिजनच्या कमतरतेची कोणतीही बाब समोर आली नव्हती. वास्तविक, Encephalitis (मेंदूचा ताप) सारख्या रोगाशी लडाई सुरु केली होती,'' असा दावाही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री आणि चिकित्सा शिक्षा मंत्र्यांना गोरखपूरला पाठवून अहवाल मागवला होता. या अहवालातही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याचं कारण देण्यात आलं नसल्याचं, मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित बातम्या

गोरखपूर: रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यानं 30 मुलांचा मृत्यू

गोरखपूर दुर्घटना: मृतांचा आकडा 36 वर,ऑक्सिजन बंद केल्याने बालकांचा मृत्यू