नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळेच दिल्लीत हिंसाचार घडला, असा घणाघाती आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. दिल्लीत आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे देखील उपस्थित होते.


दिल्ली हिंसाचाराबाबत काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सरचिटणीस प्रियांका वाड्रा उपस्थित होते. बैठकीत हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. बैठकीनंतर मीडियाशी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, "दिल्लीतील सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. पूर्वनियोजित कट रचून परिस्थिती बिघडली. भाजप नेत्यांनी प्रक्षोभक भाषणं दिली. दिल्ली निवडणुकीदरम्यान द्वेष पसरवला. दिल्लीच्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा."

Delhi Violence | हेडकॉन्स्टेबल रतनलाल यांचा गोळी लागून मृत्यू, पोस्टमार्टममधून खुलासा

केंद्र सरकारच्या जाणीवपूर्वक 72 तासात कारवाई केली नाही. सरकारच्या दुर्लक्षामुळे दिल्लीत 20 जणांचा बळी गेला, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. त्यामुळे दिल्लीतल्या हिंसेची जबाबदारी घेऊन गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसंच दिल्लीतील लोकांनी शांतता राखण्याचं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं.

दिल्लीतील परिस्थितीसाठी गृहमंत्री जबाबदार : सोनिया गांधी
"केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने 20 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिसातील एका हेड कॉन्स्टेबलचाही मृत्यू झाला. एका पत्रकारासह शेकडो लोक रुग्णालयात आहेत. मृत आणि पीडितांच्या कुटुंबीयाचं मी सांत्वन करते. ही स्थिती पाहता आमचं मत आहे की, दिल्लीतील परिस्थितीसाठी केंद्र सरकार विशेषत: गृहमंत्री जबाबदार आहे. जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यायला हवा. दोन्ही सरकारांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे राजधानीत ही परिस्थिती कायम आहे," असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.

सोनिया गांधींचे पाच प्रश्न
दिल्ली हिंसाचारावरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवार यांना काही प्रश्न विचारले आहेत.

1. गृहमंत्री रविवार कुठे होते आणि काय करत होते?
2. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारपासून काय करत होते?
3. दिल्ली निवडणुकीनंतर गुप्तचर यंत्रणांनी कोणती माहिती दिली? त्यावर काय कारवाई झाली?
4. हिंसाचार घडला त्या भागात किती पोलीस बंदोबस्त होता?
5. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानतंर निमलष्करी दलाला पाचारण का केलं नाही?

Delhi Riots | हिंसाचारग्रस्त भागात शूट अॅट साईटचे आदेश, डोवाल यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

दिल्लीकरांना मदत करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन
दिल्लीवासियांनी द्वेषाचं राजकारण नाकारावं. दिल्लीने जे गमावलं आहे, त्याची निर्मिती पुन्हा करण्यासाठी मदत करावी. तसंच दिल्लीकरांनी शांतता राखावी, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. तसंच हिंसाचारग्रस्त भागात जाऊन शक्य तेवढी मदत करा, अशी सूचना त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केली.

हिंसाचारात 20 जणांचा बळी
ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत एक पोलीस हेडकॉन्स्टेबल रतनलाल यांच्यासह 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन डझनपेक्षा जास्त वाहनं आणि दुकानांची जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनांमध्ये 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. दरम्यान रतनलाल यांचा मृत्यू दगड लागल्याने नव्हे तर गोळी लागल्याने झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट, भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे दिल्लीत हिंसा : सोनिया गांधी

भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे दिल्लीत हिंसा : सोनिया गांधी

केंद्र सरकारच्या जाणीवपूर्वक 72 तासात कारवाई केली नाही, सरकारच्या दुर्लक्षामुळे दिल्लीत 20 जणांचा बळी : सोनिया गांधी

दिल्लीतल्या स्थितीला केंद्र सरकार जबाबदार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची पत्रकार परिषदेत मागणी

हिंसाचार पाहता तात्काळ कारवाईची गरज होती : सोनिया गांधी

गेल्या रविवारपासून गृहमंत्री अमित शाह कुठे होते?: सोनिया गांधी

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी अशा स्थितीत जमिनीवर काम करणं अपेक्षित होतं, जनतेला विश्वास द्यायला हवा होता : सोनिया गांधी

दिल्लीतील जनतेनं शांतता राखावी : सोनिया गांधी

दिल्लीतल्या स्थितीवर दुपारी काँग्रेस मुख्यालय ते राष्ट्रपती भवन असा जो मोर्चा निघणार होता तो आता उद्या होणार आहे. राष्ट्रपती कार्यालयानं आज आपण उपलब्ध नसल्याचं कळवलं, त्यामुळे हा मोर्चा पुढे ढकलल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय