नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीच्या पूर्वोत्तर परिसरात हिंसा करणाऱ्या दंगेखोरांविरोधात कठोर कारवाई सुरु झाली आहे. गृहमंत्रालयाने हिंसाचारग्रस्त भागात शूट अॅड साईटचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतर हिंसाचारग्रस्त परिसरातील सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. तसंच जाफराबाद परिसरातून आंदोलनकांनाही हटवण्यात आलं आहे. पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी या परिसरात गस्त घालून दंगेखोरांना पिटाळून लावलं आहे. ईशान्य दिल्लीत मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एका हेड कॉन्स्टेबलसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे.


अजित डोवाल यांच्याकडून हिंसाचारग्रस्त भागाचा आढावा
केंद्रीय सुरक्षा सल्ला (एनएसए) अजित डोवाल मंगळवारी रात्री उशिरा हिंसाचारग्रस्त परिसरात पोहोचले. त्यांनी गाडीत बसून सीलमपूर, भजनपुरा, मौजपूर, यमुना विहार यांसारख्या हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. एनएसए डोवाल रात्री साडे अकराच्या सुमारास सीलमपूरमधील पूर्वोत्तर दिल्लीच्या पोलीस उपायुक्त अमूल्य पटनायक यांच्या कार्यालयात पोहोचले, तिथे त्यांनी शहरातील सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेतला. सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीत पूर्वोत्तर पोलीस उपायुक्त, विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था ऑर्डर) एस. एन. श्रीवास्तव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर एनएसए अजित डोवाल हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी निघाले. रात्री उशिरा त्यांची गाडी सीलमपूर, भजनपुरा, यमुना विहार, मौजपूर यांसारख्या हिंसाचारग्रस्त परिसरात फिरत होती. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते परत गेले.





Delhi Violence | हिंसाचारात दहा जणांचा मृत्यू, 186 जखमी


अमित शाहांकडून बैठकीचं सत्र
गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आणि गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. 24 तासांमधील शाह यांची ही तिसरी बैठक होती. सूत्रांच्या माहितीनुसार रात्री 7 वाजता सुरु झालेली ही बैठक रात्री 10 वाजता संपली. तसंच अमित शाह यांनी आपला त्रिवेंद्रम दौराही रद्द केला आहे.


जाफराबादमधील आंदोलकांना हटवलं
जाफराबादमध्ये सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांनाही चर्चेनंतर तिथून हटवण्यात आलं. सुमारे तीन दिवसांनंतर जाफराबादमधील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जाफराबाद मेट्रो स्टेशनखाली शनिवारपासून (22 फेब्रुवारी) आंदोलन सुरु होतं. आता हा रस्ता रिकामा करण्यात आला आहे.


Delhi Violence | दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश; दिल्ली पोलिसांकडून शांततेचं आवाहन


परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष पोलीस आयुक्त तैनात
लवकरच चांदबाग, करावलनगर आणि मौजपूरमधील परिस्थितीही नियंत्रणात येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. जवानांनी पायी मार्च करुन परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीतील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी गृहमंत्रालयाने आयपीएस अधिकारी एस एन श्रीवास्तव यांची तातडीने दिल्ली पोलीस दलाचे विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून नेमणूक केली. आयपीएस अधिकारी एस एन श्रीवास्तव सध्या सीआरपीएफमध्ये तैनात होते. गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांसह सीमा सुरक्षा दल (एसएसबी), भारत तिबेट सीमा पोलिसांचे (आयटीबीपी) जवानही तैनात केले आहेत. याशिवाय शीघ्र कृती दलाचे (आरएएफ) जवानही प्रत्येक घटनाक्रमावर नजर ठेवून आहेत.


आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू, 200 पेक्षा जास्त जखमी
ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत एक पोलीस हेडकॉन्स्टेबल रतनलाल यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन डझनपेक्षा जास्त वाहनं आणि दुकानांची जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनांमध्ये 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. दरम्यान रतनलाल यांचा मृत्यू दगड लागल्याने नव्हे तर गोळी लागल्याने झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.


मुंबईतील आंदोलनाचा प्रयत्न हाणून पाडला
मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने सीएए विरोधकांना मुंबईत एकत्र जमता आलं नाही. दिल्लीतील घडामोडींचा निषेध करण्यासाठी मुंबईत एशियाटिक लायब्ररी परिसरात जमण्याचं आंदोलकांनी ठरवलं होतं. मात्र चोख पोलीस बंदोबस्त असल्याने आंदोलक एकत्र जमू शकले नाहीत. दिल्लीतील घटनेच्या निषेधासाठी एकत्र या, असा मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला होता. सोमवारी रात्रीदेखील सीएए विरोधकांनी मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबई पोलिसांनी तिथूनही आंदोलकांनी हटकलं होतं.


Majha Vishesh | दिल्ली कुणी पेटवली? दिल्ली पोलीस इतके हतबल कसे? | ABP Majha