नवी दिल्ली : प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने आज तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ज्यामुळे नियमितपणे कर भरणाऱ्या करदात्यांची कुठल्याही त्रासातून सुटका होईल. फेसलेस मूल्यांकन, फेसलेस अपील, आणि करदात्यांची सनद अशा तीन गोष्टींची घोषणा पंतप्रधान मोदीनी आज केली. करदात्यांनी भरलेल्या विवरणपत्रात चुका काढून त्यांना वेठीस धरण्याचं प्रमाण त्यामुळे कमी होईल असा आशावाद मोदींनी व्यक्त केला आहे.


आपल्या देशाची एकूण लोकसंख्या 130 कोटी आहे पण त्यातले केवळ 5.78 कोटी लोक म्हणजे केवळ 4 टक्केच लोक कराचं विवरणपत्र दाखल करतात. ही संख्या वाढवण्यासाठी करदात्यांना आश्वासक परिस्थिती हवी म्हणून सरकार वेगवेगळे उपाय करतं आहे. कर परतावा तातडीने देण्यास सरकारने काही दिवसांपूर्वी सुरुवात केलीच होती, आता त्यात आणखी काही सुटसुटीत बदल केले जात आहेत.


फेसलेस मूल्यांकन, फेसलेस अपील म्हणजे काय?
आयकर विवरणपत्रावर शंका उपस्थित करणाऱ्या नोटीस या कर्मचाऱ्यांकडून जाण्याऐवजी त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काढल्या जातील.


या नोटीसचं प्रमाण शक्य तितकं कमी ठेवण्याचं, त्यांचं सिलेक्शन रँडम पद्धतीने करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे पूर्वग्रह ठेवून, व्यक्तीपरत्वे पाठवल्या जाणाऱ्या नोटीसांचं प्रमाण कमी होईल हा सरकारचा प्रयत्न आहे.


विवरणपत्रातल्या काही गोष्टींवर तुम्हाला अपील करायचं असल्याच त्याचं निराकरणही तुमच्या शहरातल्या अधिकाऱ्यांकडे न जाता ते रँडम पद्धतीने वेगळ्याच व्यक्तींकडे जाईल. तंत्रज्ञानाचीच जोड असल्याने यात मानवी हितसंबंध कमी होऊन भ्रष्टाचाराला आळा बसवण्यासाठी हे केलं जात आहे.


प्रामाणिक करदात्यांचं देशाच्या विकासात मोठं योगदान : पंतप्रधान मोदी


Taxpayer’s Charter | टॅक्सपेअर्स चार्टर म्हणजे काय?


यातली फेसलेस मूल्यांकन, करदात्यांची सनद या गोष्टी आजपासूनच लागू झाल्या आहेत. तर फेसलेस अपील ही सिस्टीम येत्या 25 सप्टेंबरपासून कार्यरत होणार आहे.


देशात रस्ते, पूल, धरणं, सरकारी इमारती हे सगळं करदात्यांच्याच पैशावर बांधलं जातं. त्यातही नोकरदार वर्ग नित्यनियमाने कर भरतो. पण या सगळ्याची प्रक्रिया जी आधी किचकट होती, ती टप्याटप्याने कमी केली आहे. त्यामुळे कर भरणाऱ्यांची संख्या वाढावी हा सरकारचा उद्देश आहे.


कोरोनाच्या संकटकाळात सरकारने मोठ्या प्रमाणात थकित कर परतावे दिले होते. उद्योग जगतालाही त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. आता या नव्या घोषणांमुळे तुम्ही तुमचा आयकर परतावा सहज सोप्या पद्धतीने, विनाक्लेष मिळवू शकाल अशी आशा करुया.


PM Modi | पारदर्शक मंचाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, प्रामाणिक करदात्यांसाठी सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल