नवी दिल्ली : केंद्र सरकारने चौथ्यांदा वाहनचालकांना दिलासा दिला आहे. कारण राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफी 2 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे महामार्गांवर टोल भरावा लागणार नाही.


जुन्या नोटांचा तुटवडा, सुट्ट्या पैशांचा खोळंबा असल्याने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आणखी सात दिवस राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरण्याची गरज नाही.

काळ्या पैशाविरोधात लढाईला बळ मिळावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. 8 नोव्हेंबरला हा निर्णय घेतला.

त्यानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी लोकांची धावपळ सुरु झाली. अनेकांचे दैनंदिन व्यवहारही कोलमडले. या पार्श्वभूमीवर लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात, म्हणून राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली 1 डिसेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे.

यापूर्वी 9 नोव्हेंबरला टोलमाफीची पहिली घोषणा केली होती. त्यावेळी 9 ते 11 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी करण्यात आली. मग त्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी वाढवण्यात आली. त्यानंतर पुन्हा 14 ते 18 नोव्हेंबर टोलमुक्ती देण्यात आली. पण तरीही सुट्टे पैसे आणि बँका/एटीएमबाहेरील रांगा कमी न झाल्याने पुन्हा टोलवसुली 24 नोव्हेंबरपर्यंत न करण्याचा निर्णय झाला. मग आता हाच निर्णय 1 डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.

राज्यातही 2 डिसेंबरपर्यंत टोलमाफी

दरम्यान केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही टोलमाफीची घोषणा केली आहे. 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुंबईसह राज्यातील टोलनाक्यांवर टोलमाफी असेल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

टोलमाफीच्या घोषणा

पहिली घोषणा - 9 ते 11 नोव्हेंबरपर्यंत

दुसरी घोषणा - 11 ते 14 नोव्हेंबरपर्यंत

तिसरी घोषणा - 14 ते 18 नोव्हेंबर

चौथी घोषणा - 18 ते 24 नोव्हेंबर

पाचवी घोषणा - 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2016