मुंबई: नोटबंदीवरुन शिवसेनेनं आज पुन्हा एकदा  तलवार उपसली आहे. टोकाची भूमिका घेण्यास मी मागे-पुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.


मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेच्या ३ नगरसेवकांनी प्रवेश केला. यानंतर ते बोलत होते.

ब्रिटनमध्ये ब्रेक्सिटप्रमाणे जनमत चाचणी घेतली जात आहे. पण जनतेचा कौल बघून तिकडच्या राष्ट्राध्यक्षांनी पायउतार व्हायचा निर्णय घेतला होता. इथे तसं होणार आहे? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना भावूक होण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

तसंच सव्वाशे कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घेऊ शकत नाही. नोटबंदीआधी जनतेला विश्वासात घेणं गरजेचं होतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

"माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे नावाजलेले अर्थतज्ज्ञ होते, त्यामुळे त्यांचे मत गांभीर्याने घ्यावेच लागेल. काळ्या पैशाची वसुली करताना पंतप्रधानांच्या मनात काही काळंबेरं आहे का याची शंका येते", असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

सामान्यांकडून खंडणीसारखा पैसा गोळा केला जातोय. जनतेचे अश्रू तुम्ही का पुसले नाही. ज्या जनतेने तुम्हाला मोठ्या आशेने निवडून आणले, त्यांच्या डोळ्यात तुम्ही अश्रू आणलेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

विजय मल्ल्याने कोणत्या जिल्हा बँकेतून कर्ज काढले होते का? त्याने ज्या बँकेतून कर्ज काढले होते, त्या बँकेला मात्र नोटा बदलण्याचे अधिकार कसे काय दिले? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.