On This Day In History :

  आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 14 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University) नामविस्तार दिन. प्रसिद्ध बंगाली लेखिका आणि समाजसेविका महाश्वेता देवी यांचा जन्म. विदर्भ साहित्य संघाची स्थापना आजच्याच दिवशी झालेली. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


1761 : मराठे आणि अफगाणीमध्ये पानिपतची तिसरी लढाई  


पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761  रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलून गेला.अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.


1882 - अग्रणी समाजसुधारक र धो कर्वे यांचा जन्म (Ra Dho Karve)


महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म मुरुड-रत्‍नागिरी येथे 14 जानेवारी 1882 साली झाला होता. ते धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होते सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून समाजामध्ये संततिनियमन होणे आवश्यक आहे, आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र.धों कर्वे यांनी मांडले. 'समाजस्वास्थ्य' या नावाने त्यांनी मासिक सुरू करून परिवर्तनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. र. धों. कर्वे यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली. तरीदेखील ते केवळ स्वतःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्‍नीने, व आई-वडिलांनी पूर्ण खंबीरपणे त्यांच्यामागे उभे राहून दिला.  एकदा त्यांची केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढवली होती. दुर्दैवाने ती केस ते केस हरले पण तरीही त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला.  रघुनाथ धोंडो कर्वे यांनी गोपाळ गणेश आगरकरांप्रमाणेच वैचारिक मार्ग पत्करला होता. लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या  रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सतत 27 वर्ष एकाकी लढत दिली.


 1892 : शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत यांची जयंती


शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1892 साली झाला होता. त्यांनी प्रथमश्रेणीचे 62  सामने खेळले. यात त्यांनी 9 शतके ठोकली. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (1965) व पद्मविभूषण (1991) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. 


1896: RBIचे पहिले गव्हर्नर सी. डी. देशमुख यांचा जन्म (C D Deshmukh)


भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, माजी केंद्रीय अर्थमंत्री, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि कुशल प्रशासक ते संस्कृत पंडित, वनस्पतीशास्त्रज्ञ अशा अनेक आघाड्यांवर चिंतामणराव द्वारकानाथ ऊर्फ सी. डी. देशमुख  यांचा जन्म आजच्या दिवशी 1896 साली झालेला. 


1923 : विदर्भ साहित्य संघाची स्थापना (Vidarbha Sahitya Sangha)


विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. ही संस्था अण्णासाहेब खापर्डे यांनी 14 जानेवारी 1923 रोजी अमरावती येथे स्थापन केली. त्यानंतर मार्च 1950 मध्ये संघटनेचं मुख्य कार्यालय नागपूरला हलवण्यात आले. आजही ते नागपूर येथेच आहे.  ही संस्था दरवर्षी विदर्भ साहित्य संमेलन भरवते. विदर्भ साहित्य संघाचे ’युगवाणी’ या नावाचे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे.  


1994 : मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University)


आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University) नामविस्तार दिन. त्यानिमित्ताने आज विद्यापीठ गेटवर अनेक अनुयायी एकत्र येतात आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी सुमारे 17 वर्षे आंदोलन झाले. 1994 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले. नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधुभाव पुढे नेणारा लढा होता. विद्यापीठाचा नामांतर हे  केवळ आंदोलन नव्हते, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरूप आलं होतं.



1998: दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च सन्मान जाहीर.


दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना आजच्याच दिवशी ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च सन्मान जाहीर कऱण्यात आला होता.


2000:  बाबा आमटे यांना गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान 


ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ  बाबा आमटे यांना 1999 चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांनी चंद्रपूर येथे आनंदवन नावाचा आश्रम त्यांनी सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी  झटत होते .याशिवाय 'वन्य जीवन संरक्षण', 'नर्मदा बचाओ आंदोलन' अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. 


 


 1905: दुर्गा खोटे यांचा जन्म (Durga Khote Birth Anniversary)


दुर्गा खोटे या मराठमोळ्या अभिनेत्री. त्यांचा जन्म 1905 साली आजच्याच दिवशी झालेला. त्यांनी हिन्दी व मराठी चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या. सुमारे 50  वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केला. 1982  मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते. त्यांचा मृत्यू 22 सप्टेंबर 1991 रोजी  झाला. 


1919 : कैफी आझमी यांचा जन्म     ( Birth anniversary of Poet Kaifi Azmi ) 


देशातील एक महत्वाचे कवी, गझलकार कैफी आझमी यांची आज जयंती कैफी आझमी हे प्रसिद्ध उर्दू कवी आणि बॉलिवूडचे मोठे गीतकार. त्यांचे खरे नाव अख्तर हुसैन रिझवी होते. त्यांचा जन्म 14 जानेवारी 1919 रोजी उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात झाला. त्याला गावातील शेर आणि कविता वाचनाची आवड होती.  वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी पहिली गझल लिहिली. 10 मे 2002 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 


1926 : बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांचा जन्म  ( Birth anniversary of Mahashveta Devi ) 


प्रसिद्ध बंगाली लेखिका आणि समाजसेविका महाश्वेता देवी यांचा जन्म. महाश्वेता देवी यांना भारतीय साहित्य विश्वात अत्यंत मानाचं स्थान आहे. पद्मश्री, पद्मविभूषण या नागरी सन्मानांबरोबरच साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.   'हजार चौरासी की माँ' सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांबरोबरच त्यांचं बिहार, बंगाल, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधल्या आदिवासी जमातींच्या संघर्षावर केलेलं लिखाण विशेष महत्त्वाचं ठरलं आहे.   त्याचप्रमाणे 'आरण्येर अधिकार' ही त्यांची आदिवासींच्या आयुष्यावर आधारित कादंबरीही प्रसिद्ध ठरली होती. आदिवासी जमातींवर त्यांनी केवळ लेखनच केलं नाही तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढाही दिला. रुदाली या महाश्वेता देवींच्या लघुकथेवर चित्रपटही आला होता.


इतर महत्वाच्या घटना आणि घडामोडी 


1977 : भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर नारायण कार्तिकेयन यांचा जन्म. या क्षेत्रात नारायण कार्तिकेयन यांनी भारताचं नाव जगभरात पोहोचवलं.
  
1742 : एडमंड हॅले  यांचा मृत्यू.   धूमकेतूचा शोध लावणारे हॅले ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते.