जम्मू : पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पाकिस्ताननी रेंजर्सने पुन्हा एकदा जम्मूतील आरएसपुरा भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. संतापजनक म्हणजे पाणी पित असलेल्या बीएसएफ जवानावर पाकिस्तानच्या जवानांनी गोळीबार केला. हा जवान यामध्ये गंभीर जखमी झाला आहे.


भारतीय जवानांनीही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या या गोळीबाराचा समाचार घेत तिघांचा खात्मा केला. याच आठवड्यात भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ सैन्यातील अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरमधील पूँछ सेक्टरमध्ये एलओसीवर फ्लॅग मीटिंग घेऊन सीमवेर शांतता ठेवण्याबाबत निर्णय घेतला होता.

गेल्या दोन दिवसात पाकिस्तानी रेंजर्सने दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानी रेंजर्सने 2.50 वाजता विनाकारण जम्मू जिल्ह्यातील पर्गवाल भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही याला चोख प्रत्युत्तर दिलं, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

पुलवामात दहशतवादी हल्ला, 8 जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्याच्या उद्देशाने आज पहाटे 4.30 वाजता दहशतवादी घुसले. पुलवामाच्या पोलीस लाईनमध्ये हे दहशतवादी घुसले असून त्यांनी केलेल्या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले आहे. थेट पोलिसांच्या क्वॉर्टरलाच लक्ष्य केल्यानं हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 3 पोलीस आणि 5 सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांमध्ये साताऱ्याचे रवींद्र धनवडे यांचाही समावेश आहे.