रेल्वे रुळावरील तड्यामुळे पाटणा-इंदूर एक्स्प्रेसच्या 125 प्रवाशांचे बळी?
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2016 07:39 AM (IST)
कानपूर : एक तडा... एक अपघात... 125 हून अधिक बळी. कानपूरजवळ पाटणा-इंदूर एक्स्प्रेस घसरली आणि पहाटेच्या झोपेतच प्रवाशांना मृत्यूनं गाठलं. पण या अपघाताच्या भीषणतेपेक्षा त्या अपघाताचं कारण जास्त भीषण आहे. रेल्वेच्या रुळांना गेलेला एका तडा या भयावह अपघाताचं कारण असल्याचं म्हटलं जातं. अद्याप याला तपास अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र हे कारण खरं ठरल्यास रेल्वे प्रवाशांची सुरक्षा हा गंभीर प्रश्न ठरेल. देशात तब्बल 1 लाख 15 हजार किलोमीटरचं रेल्वे रुळांचं जाळं आहे. त्यावरुन देशात दररोज 12 हजार 617 पॅसेन्जर रेल्वे आणि 7 हजार 421 मालगाड्या धावतात. वर्षाला तब्बल 800 कोटी प्रवाशांची ये-जा या रुळांवरून होत असते. त्यासाठी दर वर्षी तब्बल 8 लाख 10 ह जार कोटी रुपयांची तरतूद केली जाते. तर एकूण तरतुदीच्या निम्मा खर्च हा फक्त रुळांच्या देखभालीसाठी होतो. पण असं असतानाही रुळांची काळजी घेणं का शक्य होत नाही? असा सवाल उपस्थित होतो.