मुंबई: सूरत डायमंड बुर्सच्या (Surat Diamond Bourse) 135 कार्यालयांचं औपचारिक उद्घाटन मंगळवारी होणार आहे. 135 हिरे व्यापाऱ्यांपैकी 26 व्यापारी मुंबईतून कायमस्वरूपी कार्यालये बंद करून सुरतला स्थलांतरित झालेत. आता मंगळवारी 135 व्यापारी हिऱ्यांच्या व्यवसायाला औपचारिक सुरुवात करणार आहेत. तसचं 17 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी डायमंड बाजाराचे औपचारिक उद्घाटन करणार आहेत. 


सूरतमधील डायमंड बुर्स हा पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सूरतच्या डायमंड बुर्समध्ये एकूण 983 कार्यालयं आहेत. सूरत डायमंड बाजारामध्ये व्यापार सुरू करण्यापूर्वी, SBI ने 20 नोव्हेंबर रोजी डायमंड बाजारामध्ये एका शाखेचं उद्घाटन केलं आहे. आता पुढच्या महिन्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. 


कशी आहे डायमंड बोर्स ही इमारत?


सूरत डायमंड बोर्समध्ये 14 मजल्यांचे 9 टॉवर्स 67 लाख चौरस फूट जागेवर उभारण्यात आलेत. टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची 4 हजार 300 कार्यालये आहेत. ही इमारत तयार होण्याआधीच कार्यालये हिरे व्यापाऱ्यांनी विकत घेतली होती. मुंबई आणि सूरतमधील व्यापाऱ्यांना एकाच छताखाली आणता यावे यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतय. तसेच मुंबईतील वाढती वाहतुकीची समस्या, कर्मचाऱ्यांना प्रवास करायला होणाऱ्या अडचणी आणि घरांच्या अव्वाच्या सव्वा किमतींमुळे बीकेसीतील व्यापारी सूरतकडे स्थलांतरीत होत असल्याचं चित्र आहे. 


कर्मचाऱ्यांना सोयी मिळाव्यात याकरीता त्यांना तिथे फ्लॅट्स देखील देण्यात आले. हे सर्व फ्लॅट्स सर्व सोयींनी युक्त असे आहेत. जगातील सर्वात मोठे कस्टम हाऊस सूरतमध्ये तयार करण्यात आले. सोबतच सूरत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू होणार आहेत. त्यामुळे सूरतचे हिरे व्यापारी आता मुंबईपेक्षा सुरतमधून जगभरातील हिऱ्यांचा व्यवसाय करू शकतील. दरम्यान, मुंबईतील काही व्यापारी सुरतला आपला व्यवसाय नेणार असल्याने यावर राज्यात राजकारण रंगताना दिसतंय. महाराष्ट्रातून पुन्हा व्यवसाय बाहेर जात असल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकार टिकेची झोड उठवली आहे.


राज्यातून सूरतला जाणाऱ्या डायमंड व्यापाऱ्यांची संख्या छोटी आहे. मात्र येत्या काळात जर सोयीसुविधा चांगल्या असल्या आणि गुजरात सरकारकडून व्यवसायाला चालना मिळवण्याचे चांगले प्रयत्न केले गेले तर ही संख्या येत्या काळात वाढू शकेल. अशातच राज्य सरकारनं अशा व्यवसायांना चालना देणं आणि वन विन्डो सिस्टिम तयार करत व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवणे देखील गरजेचे आहे. 


ही बातमी वाचा :