नवी दिल्ली : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसापूर्वी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आज पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती मिळाली आहे.


अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे नियोजित जगमित्र शुगर मिलसाठी चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर जमीन ही देवस्थानची असल्याचा दावा तक्रारदारांतर्फे करण्यात आला होता.
सरकारी जमिनीच्या बेकायदा हस्तांतरप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद उच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर आज सुनावणी होणार असताना पोलिसांनी आज पहाटेच बर्दापूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली.

या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे.  त्याच बरोबर आज सकाळी दाखल झालेल्या गुन्ह्यालाही आता स्थगिती मिळाली आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणण्याचा सरकारचा हा डाव असल्याची चर्चा होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे धनंजय मुंडे यांनी स्वागत केले असून सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.