मुंबई : देशपातळीवर अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आयआयटी जेईई परीक्षेचा निकाल लागला आहे. यात महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ताने 100 पर्सेंटाईल गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.




यंदा जेईईमध्ये पहिल्यांदाच पर्सेंटाईल पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. 27 मे रोजी आयआयटीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. यात महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ताने 100 पर्सेंटाईल गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. कार्तिकेय हा मूळचा चंद्रपूरचा असून मुंबईत तो जेईईची तयारी करत होता.

दोन वर्ष मी स्मार्ट फोनपासून दूर राहून नियमित अभ्यास केला आणि त्यामुळेच हे यश मिळाल असल्याचा कार्तिकेयने सांगितलं आहे. आयआयटी मुंबईत कॉम्प्यूटर सायन्सला कार्तिकेयला प्रवेश घ्यायचा आहे.

त्याला 372 पैकी 346 गुण मिळाले आहेत. तर  शबनम सहाय ही मुलींमध्ये प्रथम आली असून तिला 372 पैकी 308 गुण मिळाले आहेत.

या परीक्षेत पहिला आणि दुसरा पेपर देणाऱ्या एकूण 1,61,319 विद्यार्थ्यांपैकी 38,705 परीक्षार्थी पास झाले आहेत. यामध्ये 5,356 विद्यार्थीनींचा समावेश आहे.