नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वोच्च न्यायालयातील वकील ते केंद्रीय मंत्री असा प्रवास त्यांनी केला होता.


सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तसेच भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री अशीदेखील त्यांची ओळख आहे. स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

सुषमा स्वराज यांची कारकीर्द

14 फेब्रुवारी 1952 मध्ये हरयाणातील अंबाला छावणीमध्ये सुषमा स्वराज यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते.
त्यांनी अंबाला येथे सनातन धर्म कॉलेजमधून संस्कृत तसेच राज्यशास्त्रात पदवी घेतली
चंदीगडमधून लॉची पदवी घेतली
13 जुलै 1975 मध्ये त्यांनी स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला
त्यानंतर काही काळ त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. त्यांचे पती स्वराज कौशलही याच काळात सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते.
1977 मध्ये त्या हरयाणाच्या अंबाला छावणी विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा निवडून आल्या
1977 साली वयाच्या 25 व्या वर्षी सुषमा स्वराज हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री झाल्या.
13 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर 1998 या काळात त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहिला.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2000-2003 दरम्यान त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले.
2003-2004 दरम्यान त्यांनी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री म्हणून काम पाहिले,
तसेच त्यांनी दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला.
2009 ते 2014 या काळात त्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या.
2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा एनडीएकडून पंतप्रधानपदासाठीचे नाव जाहीर झाले नव्हते, तेव्हा स्वराज यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती.
2014 ते 2019 या काळात सुषमा स्वराज या देशाच्या पूर्णवेळ परराष्ट्रमंत्री होत्या.

व्हिडीओ पाहा