नवी दिल्ली : सुखोई लढाऊ विमानात ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडण्याच्या कामात सरकारने गती आणली आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेता येईल, अशादृष्टीने 40 सुखोई लढाऊ विमानांच्या बनावटीत बदल केले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे.


सरकारने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड यांना या हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन डिसेंबर 2020 च्या निर्धारित वेळेच्या आधीच हे काम पूर्ण होऊ शकेल.

2016 मध्येच निर्णय मात्र काम धीम्या गतीने
2016 मध्ये सरकारने ब्रह्मोस क्षेपणास्त्र 40 सुखोई लढाऊ विमानांमध्ये जोडण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाचं काम 2017 च्या अखेरीस सुरु झालं होतं, पण अजूनही त्याचा वेग अतिशय धीमा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट एअरस्ट्राईक आणि त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर सैन्य आणि सुरक्षा अधिकारिऱ्यांच्या एका बैठकीत सुखोई विमानात ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडण्याच्या प्रक्रियेत वेग आणण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. याआधी हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरु झाली.

हवाई दलाची ताकद वाढणार
हे काम पूर्ण झाल्यानंतर सुखोईद्वारे समुद्र किंवा जमिननीवर मारा करण्याच्या वायुसेनेच्या क्षमतेत आणखी वाढ होणार आहे. सुखाई विमानाची उड्डाण क्षमता आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या ताकदीच्या जोरावर युद्धभूमीत हवाई दलाचं वर्चस्व वाढेल.

ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने मारा करणारं ब्रह्मोस क्षेपणास्त्र
ब्रह्मोस हे जगातील सर्वात जलद सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. 2.5 टन वजनाचं ब्रह्मोस क्षेपणास्त्र 290 किमी परिसरात ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने मारा करतं. म्हणजे जर भारतीय हवाई दलाला शत्रू देशातील एखादं ठिकाण नष्ट करायचं आहे, जे 290 किमीच्या आत आहे, तर सुखोई विमानाला सीमा पार करण्याचीही गरज भासणार नाही. भारतीय हद्दीत राहूनही ते हल्ला करु शकतात. दरम्यान 22 नोव्हेंबर, 2017 रोजी ब्रह्मोसच्या एअर लॉन्च वॅरिएंटचं सुखोई-30 मधून यशस्वीरित्या परीक्षण झालं होतं.