12th December In History : भारतीय राजकारण आणि समाजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि भारतीय राजकारणात विविध पदे भूषवणाऱ्या शरद पवारांचा जन्मदिन. तसेच भाजपचे दिवंगत नेते रजनीकांत आणि चित्रपटसृष्टीचा थलैवा अशी ओळख असलेल्या रजनीकांत यांचाही आज जन्मदिन. या व्यतिरिक्त इतिहासात आज कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे पाहू. 


1232- गुलाम वंशाच्या इल्तमशने ग्वाल्हेरवर कब्जा मिळवला 


गुलाम वंशाच्या इल्तमशने (Iltutmish) 12 डिसेंबर 1232 रोजी ग्लाल्हेरवर कब्जा मिळवला. इस्तंबूलमधील इल्बारी टोळीप्रमुखाचा मुलगा असलेल्या शमशुद्दीन इल्तमश भारतात तुर्की साम्राज्याचा विस्तार केला. इल्तमश लहान असताना त्याच्या भावांनी त्याला एका गुलामांच्या व्यापाऱ्याला विकलं होतं. त्या व्यापाऱ्याने महमंद गझनीच्या साम्राज्यातील लाहोरचा सुभेदार असलेल्या कुतुबुद्दीन ऐबकला विकलं. इल्तमशच्या कर्तबगारीने भारावलेल्या कुतुबुद्दीन ऐबकने त्याला दिल्लीचा सुभेदार केला आणि जावईही करुन घेतलं. पुढे कुतुबुद्दीन ऐबकच्या मृत्यूनंतर इल्तमशने दिल्लीची सत्ता काबीज केली आणि इल्बारी वंशाचं राज्य स्थापन  केलं. सन 1211 ते 1236 या दरम्यान इल्तमशने दिल्लीवर राज्य केलं आणि भारतात तुर्की साम्राज्य बळकट केलं. 


कुतुबुद्दीन ऐबकच्या (Qutb ud-Din Aibak) स्मरणार्थ इल्तमशन दिल्लीत कुतुबमिनार (Qutb Minar) बांधलं. तसेच त्याने दिल्ली आणि परिसरात अनेक मशिदी, दर्गे बांधल्या, त्याने हज यात्रकरूंसाठी निवासस्थानं बांधली. सन 1236 मध्ये इल्तमशच्या मृत्यूनंत त्याची मुलगी रजिया सुलतान ही दिल्लीच्या सुलतानपदी आली. ती भारतातील पहिली महिला राज्यकर्ती होती. 


1800- वॉशिंग्टन डीसी अमेरिकेची राजधानी 


वॉशिंग्टन डी.सी. (Washington D.C.-District of Columbia डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, ) ही अमेरिका देशाची राजधानी आहे. अमेरिकन क्रांती झाल्यानंतर, 12 डिसेंबर 1800 रोजी वॉशिंग्टन डीसी या शहराची अमेरिकेची अधिकृत राजधानीचे शहर म्हणून  निवड करण्यात आली. मेरीलँड आणि व्हर्जिनिया राज्यांच्या मधे पोटॉमॅक नदीच्या काठावरील एका जमिनीच्या तुकड्यावर वॉशिंग्टन, डी.सी. शहर वसवलं गेलं आहे. या शहराला अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे नाव देण्यात आले. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हे कोणत्याही राज्याचे भाग नसून एक स्वतंत्र जिल्हा आहे. 


1822- मेक्सिकोला अमेरिकेची मान्यता


मेक्सिको किंवा मेक्सिकोची संयुक्त संस्थाने (स्पॅनिशमध्ये एस्तादोस युनिदोस मेक्सिकानोस- Estados Unidos Mexicanos United Mexican States) हा उत्तर अमेरिकेतील एक देश आहे. मेक्सिको जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषक असलेला देश आहे. मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचा एक भाग समजले जाते. 15 सप्टेंबर 1810 रोजी हा देश स्वातंत्र्य झाला. अमेरिकेच्या दक्षिण सीमेला खेटून असलेल्या या देशाचा 12 डिसेंबर 1822 रोजी अमेरिकेने स्वातंत्र देशाची मान्यता दिली. 


1911- भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला स्थलांतरित झाल्याची घोषणा


भारताच्या दौऱ्यावर आलेल्या किंग जॉर्ज पाचवा यांने 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबार भरवला होता. यामध्ये त्याने भारताची राजधानी कोलकात्या ऐवजी आता दिल्ली असेल अशी घोषणा केली होती. त्याचवेळी देशाच्या सध्याच्या राजधानीचा पाया घालण्यात आला. नंतरच्या काळात राजधानीतील सर्व कामं पूर्ण करण्यात आली आणि 13 फेब्रुवारी 1931 रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड एर्विन यांनी त्याचं उद्धाटन केलं. 


भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही निती अवलंबली होती. त्यानुसार 16 ऑक्टोबर 1905 रोजी त्यांनी बंगालची फाळणी केली आणि हिंदू-मुस्लिमांच्यात फुट पाडली. ब्रिटिशांच्या या निर्णयाच्या विरोधात बंगालमध्ये मोठा असंतोष पसरला. त्यानंतर क्रांतीकारकांनी आपल्या कारवाया सुरू केल्या. त्याचा परिणाम म्हणजे कोलकात्यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ले होऊ लागले, अनेक राजकीय हत्या घडू लागल्या. या घटनांनंतर कोलकाता आता ब्रिटिशांसाठी सुरक्षित नसल्याची त्यांना जाणीव झाली. त्यानंतर भारताचे केंद्र असलेल्या दिल्ली या ठिकाणी राजधानी हलवण्याची तयारी ब्रिटिशानी सुरू केली.


1940- ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जन्मदिन (Sharad Pawar Birthday) 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आज जन्मदिन. 12 डिसेंबर 1940 रोजी बारामतीमध्ये त्यांचा जन्म झाला. मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आणि दमदार नेतृत्व अशी शरद पवार यांची ओळख आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवारांनी जवळपास 50 वर्षे देशाची सेवा केली. वयाच्या 37 व्या वर्षी ते पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. नंतरच्या काळात त्यांनी राज्याचे चार वेळा मुख्यममंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, कृषीमंत्री म्हणून काम केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे कृषीमंत्री असा पल्ला गाठणाऱ्या पवारांचं राष्ट्रीय राजकारणातील स्थान अढळ आणि महत्त्वाचं आहे. 


1949- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिन (Gopinath Munde Birth Anniversary)


गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नावं. 12 डिसेंबर 1949 रोजी बीडमधील परळी वैजनाथ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. गोपीनाथ मुंडेनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम केला. प्रमोद महाजनांच्या सोबत त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. आज महाराष्ट्रात भारतीय जनतेचा जो वटवृक्ष वाढलाय त्याचं श्रेय हे निर्विवादपणे गोपीनाथ मुंडेंना जातंय. गोपीनाथ मुंडेंनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. इंदिरा गांधींनी भारतात लावलेल्या आणिबाणी विरोधात त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी अटक करुन त्यांना नाशिकच्या तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.


गोपीनाथ मुंडेंनी 1980–1985 आणि 1990–2009 या काळात पाच वेळा विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलं. 1992-1995 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. महाराष्ट्रात 1995 साली ज्यावेळी युतीचं सरकार आलं त्यावेळी त्यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. 2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रचंड मतांनी विजय मिळवला. लोकसभेत त्यांची भाजपच्या उपनेतेपदी निवड झाली. केंद्रात मोदींचं सरकार आलं त्यावेळी 26 मे रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्या कार्यकर्त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. केवळ एका आठवड्यानंतर 3 जून रोजी दिल्ली विमानतळाकडे जाताना गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.


1950- सुपरस्टार रजनीकांत यांचा जन्मदिन (Rajinikanth Birthday)


भौतिकशास्त्राच्या नियमांना चॅलेन्ज देणारे, गुरूत्वाकर्षणासारखा सर्वमान्य नियमही ज्यांनी आपल्या अॅक्शन सीन मधून खोटा ठरवणाऱ्या आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात फेमस असणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा आज जन्मदिन. 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरुमध्ये त्यांचा जन्म झाला. 
वयाच्या सत्तरीनंतर बॉक्स ऑफिसवर कोटी-कोटींची उड्डाणे घेणारे रजनीकांत यांनी बॉलिवूडवर एक वेगळीच छाप सोडली आहे. बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते जगभरातील सर्वात प्रतिभाशाली आणि लोकप्रिय अभिनेते रजनीकांत हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, बंगाली अशा विविध भाषेतल्या सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला असला तरी त्यांच्या सिनेमा हा भाषिक बंधनात अडकला नाही. जगभरात रजनीकांत यांचे कोट्यवधी चाहते आहेत.


1963- केनिया स्वतंत्र झाला


पूर्व आफ्रिकेतील देश असलेला केनिया हा आजच्याच दिवशी म्हणजे 12 डिसेंबर 1963 रोजी स्वतंत्र झाला. 


1971- संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा इंदिरा गांधींचा धाडसी निर्णय 


देश स्वतंत्र झाल्यानंतर बहुतांश संस्थानं देशात विलिन झाली. त्यामुळे विशेष बाब म्हणून त्यावेळच्या घटनासमितीने संस्थानिकांसाठी तनखे सुरू करण्याची व्यवस्था केली. पण नंतरच्या काळात म्हणजे इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द केला. 12 डिसेंबर 1971 रोजी त्या वेळच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी संस्थानिकांना देण्यात येणारे तनखे रद्द करण्याचा ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला. 1969 मध्ये संसदेमध्ये आलेले हे विधेयक राज्यसभेमध्ये फक्त एक मत कमी पडल्याने फेटाळले गेले होते. नंतर 1971 मध्ये 26 वी घटनादुरुस्ती म्हणून ते मंजूर करण्यात आलं. 


1990- टी एन शेषन भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त


निवडणुका म्हटल्या आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हटलं तर आजही अनेकांच्या डोळ्य़ासमोर एकच चेहरा येतोय, आणि तो म्हणजे टी.एन. शेषन (T. N. Seshan) यांचा. आजच्याच दिवशी म्हणजे 12 डिसेंबर 1991 रोजी टीएन शेषन यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून  निवड झाली. टी.एन. शेषन हे तामिळनाडू केडरचे 1955 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी होते. टी.एन. शेषन यांनी 27 मार्च 1989 ते 23 डिसेंबर 1989 पर्यंत भारताचे 18 वे कॅबिनेट सचिव म्हणून काम केले. त्यांनी 12 डिसेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1996 या दरम्यान भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलं.


मुख्य निवडणूक आयुक्त या नात्याने टीएन शेषन यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. टी एन शेषन यांच्यामुळे देशातील जनतेला निवडणुका कोण घेतात, निवडणुकीचे नियम काय आहेत याची माहिती मिळाली. आदर्श आचारसहिंता कशी असावी आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी याचा पायंडा टीएन शेषन यांनी घातला. टीएन शेषन यांचे काम आजही मार्गदर्शक असंच आहे. 


1996- भारत आणि बांग्लादेशमध्ये 30 वर्षाच्या गंगा पाणी वाटप करारावर  सह्या


आजच्याच दिवशी 12 डिसेंबर 1996 रोजी भारत आणि बांग्लादेशमध्ये गंगा पाणी वाटप करारावर सह्या करण्यात आल्या. हा करार 30 वर्षांसाठी करण्यात आला आहे. 


ही बातमी वाचा :