नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करण्यासाठी शरद पवारांच्या हालचाली सुरु असल्याच्या चर्चा सुरु असतानाच पवारांनी मात्र या सर्व शक्यतांवर काट मारली आहे. विलिनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं. राहुल गांधींनी पवारांची भेट घेतल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं होतं.


विलिनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे झालं, त्याची तपशीलवार माहिती घेतली.
लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे त्यासंदर्भात रणनीती तातडीने ठरवण्याची गरज आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आहे का? तुम्हाला राज्यसभेत विरोधीपक्षनेतेपदाची ऑफर आहे का? या प्रश्नावर नेतृत्वाची कमतरता असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असावं, असं उत्तर पवारांनी हसून दिलं.

व्हिडीओ पाहा


समोर पर्याय दिसत नसताना मैदान सोडणं योग्य नाही, असं परखड मत शरद पवारांनी राहुल गांधींनी दिलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं. आपण असे अनेक पराभव पाहिलेले आहेत. यातून सावरण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. तो नक्कीच करता येईल, असं शरद पवार म्हणाले.

तर इतिहासाची पुनरावृत्ती

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला तर ती इतिहासाची पुनरावृत्ती ठरेल. शरद पवारांनी यापूर्वी 1986 मध्ये त्यांचा समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये हे विलीनीकरण पार पडलं होतं.

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? राहुल गांधी शरद पवारांच्या भेटीला


राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर लोकसभा आणि राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकतं. काँग्रेसकडे सध्या केवळ 51 खासदारांचे संख्याबळ आहे. लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान 55 खासदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे 5 खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेमध्ये विलीन केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांचे संख्याबळ 55 पेक्षा जास्त होईल, त्यामुळे त्यांना अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवता येईल.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. काँग्रेसने केवळ 44 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदाला मुकावे लागले होते. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद होते, परंतु काँग्रेसकडे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद नव्हते.

यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ 51 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे यंदादेखील काँग्रेसला लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. त्यामुळेच राहुल गांधी राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत.