Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धावर अमेरिका, युरोप आणि अवघं जग रशिया विरोधात एकवटलं असताना भारत मात्र सातत्याने या प्रश्नावर तटस्थ भूमिका घेतोय. भारताची तटस्थता ही एक प्रकारे रशियाची मदतच आहे असं समजलं जातंय. हा इतिहास समाजवाद, 1957 आणि 1961 सालच्या घटना, 1971 चे भारत-पाकिस्तान युद्ध ते थेट कारगिल अन् अलिकडच्या काळापर्यंत असा आहे. 


अमेरिकेची नाराजी
भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताने घेतलेली समाजवादाची भूमिका आणि अलिप्ततावाद चळवळीचे नेतृत्व यामुळे अमेरिका भारतावर काहीशी नाराज होती. 'नाम' जरी अलिप्त देशांचा गट असला तरी या गटावर रशिया समर्थनाचा आरोप अमेरिकेकडून केला जात होता. हीच संधी साधून पाकिस्तानने अमेरिकेशी जवळीक साधली आणि भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या नादी लागून अमेरिकेने 1957, 1961 आणि 1971 या तीन वेळेला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदमध्ये भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी रशियाने आपले माप भारताच्या पारड्यात टाकलं आणि पाकिस्तान-अमेरिकेचा डाव उधळला.


1957 काश्मीर प्रश्नावरून भारताची कोंडी
रशियाच्या कम्युनिस्ट पार्टीचे निकिता खुश्च्रेव 1955 साली भारताच्या दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं वक्तव्य केलं. "आम्ही भारताचे इतक्या जवळ आलो आहोत की हिमालयाच्या शिखरावरून भारताने एक हाक जरी मारली तरी आम्ही भारताच्या बाजूने उभे राहू असं ते म्हणाले होते. अमेरिकेने पाकिस्तानची तळी उचलत काश्मीरप्रश्नी भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन 1957 साली सुरक्षा परिषदेमध्ये काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करावा अशा आशयाचा ठराव मांडला. त्यावेळी रशियाने आपला व्हेटो म्हणजे नकाराधिकार वापरला आणि अमेरिकेचा हा ठराव नामंजूर केला.


1961 गोवा मुक्ती संग्राममधील कारवाई
गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी भारताने त्या ठिकाणी कारवाई केली. गोवा हा भारताचा एक अविभाज्य भाग होता. पण भारताची ही कारवाई चुकीची असल्याचा गाजावाजा करत, ती थांबवावी यासाठी अमेरिकेने 1961 साली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतमध्ये एक ठराव आणला. अमेरिकेच्या या ठरावाला ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्कीची साथ मिळाली. पण रशियाने या विरोधात भूमिका घेत भारताचे समर्थन करत अमेरिकेच्या ठरावाविरोधात व्हेटो वापरला.


1971 बांगलादेश स्वातंत्र्य लढा
बांगलादेश म्हणजे त्या वेळेच्या पूर्व पाकिस्तानमध्ये शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढा सुरू झाला. त्याला भारताचा पाठिंबा होता. पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराविरोधात मुजीबुर रहमान यांनी भारताला मदतीचे आवाहन केल्यानंतर भारताने कारवाई केली. भारतीय लष्कर बांगलादेशमध्ये घुसल्यानंतर अमेरिकेचा चांगला जळफळाट झाला. भारताने आपले सैन्य माघार घ्यावं यासाठी अमेरिकेने भारताविरुद्ध संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये ठराव मांडला. पण या वेळेसही रशिया संकटमोचका प्रमाणे भारताच्या मदतीला आला. रशियाने अमेरिकेच्या ठरावाविरोधात व्हेटोचा वापर केला. पुढे भारत पाकिस्तानचे दोन तुकडे करू शकला आणि बांगलादेश स्वतंत्र झाला.


दरम्यान, पाकिस्तानच्या मदतीसाठी, भारतावर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने आपले सातवे आरमार हिंदी महासागरात घुसवण्याचा प्रयत्न केला. पण रशियानेही त्यांचं मोठं नौदल अमेरिकेच्या मागावर ठेवलं. त्यामुळे नाईलाजाने अमेरिकेला माघार घ्यावी लागली आणि तिसरे महायुद्ध टळलं.


1957, 1961 आणि 1971 साली अमेरिका-पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी कोंडी करायचा प्रयत्न केला. पण रशियाने तो डाव हाणून पाडला. रशियाच्या याच मदतीची परतफेड आज भारत कुठेतरी करतोय असं चित्र निर्माण झालंय. रशियाच्या युक्रेनवरील कारवाईविरोधात भारताने तटस्थ भूमिका घेत याचा प्रत्यय आणून दिला आहे.


आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणीच कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो. आज भारतासमोरील प्रश्नं आणि आव्हानं बदलली आहेत. आज भारतासमोर पाकिस्तान बरोबरच चीनच्या आक्रमक भूमिकेचही मोठं आव्हान आहे. अशावेळेस चीनच्या या आक्रमणाचा सामना करण्यासाठी भारताला अमेरिकेची मदत उपयोगी पडते. त्यामुळेच युक्रेन-रशिया युद्ध जर लांबलं किंवा त्याचा परिणाम मोठा झाला तर भारताला आपली तटस्थतेची भूमिका कायम ठेवता येणे अवघड आहे.


संबंधित बातम्या :