Rameshwar Nath Kao : अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयए आणि इस्त्रायलची संस्था मोसादच्या जगभरातील उचापती, त्यांनी केलेल्या उलथापालथींच्या कथा अगदी चवीनं सांगितल्या जातात. जेम्स बॉन्डच्या धैर्याच्या गोष्टी चित्रपटांतून समोर आणल्या जातात. पण भारतातही असा एक गुप्तचर होता, ज्याच्या नुसता नावाने अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि इतर गुप्तचर थरथर कापायचे. रामेश्वर नाथ काव असं हे नाव असून त्याचा संदर्भ अलिकडच्या काळातील वेबसिरीजमध्ये आपल्याला सातत्याने मिळतो. रामेश्वर नाथ काव (Rameshwar Nath Kao) हे भारतीय गुप्तचर संघटना रॉचे (R&AW) संस्थापक होते. बांग्लादेश मुक्तीसंग्रामात (Bangladesh Liberation Day) त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावून पाकिस्तानचे (Pakistan) दोन तुकडे केले, तसेच अवघ्या तीन अधिकाऱ्यांच्या मदतीने, अमेरिका (USA) आणि चीनच्या (China) नाकावर टिच्चून सिक्किमला (Sikkim) भारतात विलीन केलं. भारताच्या रिसर्च अॅन्ड अॅनालिसिस विंग अर्थात रॉचे पहिले प्रमुख रामेश्वर नाथ काव यांचा आज जन्मदिवस. 


रामेश्वर काव हे 70 च्या दशकातील जगप्रसिद्ध गुप्तहेर होते. आज भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ आणि इन्टेलिजन्स ब्युरोची (Intelligence Bureau) जी घडी बसली आहे ती घडी रामेश्वर काव यांनीच बसवली आहे. त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या भारतीय गुप्तचरांना 'काव बॉईज' असं म्हटलं जायचं. या काव बॉईजनी जगभर धुमाकूळ घालत अनेक सिक्रेट ऑपरेशन यशस्वी केलेत. 


रामेश्वर काव यांचा जन्म 10 मे 1918 साली वाराणसीमध्ये झाला होता. 1940 साली ते ब्रिटिशांच्या इंपिरिअल पोलिस सर्व्हिसमध्ये सामिल झाले. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, 1948 साली इन्टेलिजन्स ब्युरोची स्थापना करण्यात आली आणि त्याचे सहाय्यक निर्देशक म्हणून रामेश्वर काव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यावर पंतप्रधान नेहरूंच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली. 


'काश्मीर प्रिन्सेस' तपास


रामेश्वर काव यांच्या आयुष्यातील सर्वात पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे त्यावेळच्या चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी संबंधित काश्मीर प्रिन्सेस या हाय प्रोफाईल केसचा तपास. 1955 साली चीनचे तत्कालीन पंतप्रधान चू एन लाय हे एअर इंडियाच्या 'काश्मीर प्रिन्सेस' नावाच्या एका विमानाने बांडुंग परिषदेत भाग घेण्यासाठी भारतात येणार होते. सुदैवाने त्यावेळी त्यांची तब्येत बिघडली आणि अगदी शेवटच्या क्षणाला त्यांनी आपला दौरा रद्द केला. 


हॉंगकॉंगवरुन येणाऱ्या या विमानाचा इंडोनेशियाजवळ अपघात झाला आणि त्यामध्ये चीनच्या उच्च अधिकाऱ्यांचा आणि पत्रकारांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास करण्याचं काम काव यांच्यावर सोपवलं. या घटनेत तैवानच्या गुप्तचर खात्याचा हात असल्याचं काव यांनी उघडकीला आणलं. काव यांच्या या तपासावर चीनचे पंतप्रधान खूश झाले आणि त्यांनी काव यांचा सन्मान केला. 


'रॉ' ची स्थापना आणि काव यांच्याकडे जबाबदारी


आयबी अर्थात इंटेलिजन्स ब्युरो ही भारतीय गुप्तचर संस्था देशांतर्गत सुरक्षेवर लक्ष देत होती. त्यामुळे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी अमेरिकेच्या सीआयए (CIA) आणि ब्रिटनच्या एमआय 6 (MI 6)  या गुप्तचर खात्याच्या धर्तीवर भारतातही 1968 साली रॉ ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. रॉचे पहिले प्रमुख म्हणून रामेश्वर काव यांची नियुक्ती करण्यात आली. आपली नियुक्ती योग्य आहे हे सिद्ध करण्याची संधी काव यांना दोनच वर्षात मिळाली.


Bangladesh Liberation Day : बांग्लादेशचे मुक्तीसंग्राम आणि पाकिस्तानचे दोन तुकडे


पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याच्या बांग्लादेशमध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरु झाली होती. 1970 साली काव यांनी याचा फायदा घेतला आणि बांग्लादेश मुक्ती वाहिनीच्या एक लाखांहून अधिक जवानांना सैनिकी प्रशिक्षण दिलं. राव यांचे गुप्तचरांचे जाळे इतकं मजबूत होतं की त्यांना पाकिस्तान भारतावर कधी हल्ला करणार आहे याची तंतोतंत माहिती होती. त्यांच्या माहितीच्या आधारेच भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला आणि त्याचे दोन तुकडे केले. 


History of Sikkim : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून सिक्कीमचे विलिनीकरण


बांग्लादेशच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. त्यामुळे त्यांनी भारताच्या आजूबाजूचे सर्व प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला. सिक्कीम त्यावेळी वेगळा भाग होता आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही भारताची होती. सिक्कीममध्ये चोग्याल घराण्याचं राज्य होतं आणि ते अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयएच्या संपर्कात होते. सिक्कीमला संरक्षण देऊन आपले अंकित बनवण्याचा अमेरिकेचा डाव होता. तर सिक्कीमच्या सीमेवर चीनचे सैनिकही तैनात होते. सिक्कीमचा भूभाग हा संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, त्यामुळे तो भारताच्या ताब्यात असावा असा प्रस्ताव रामेश्वर काव यांनी इंदिरा गांधी यांच्यासमोर मांडला. 


इंदिरा गांधींनी हिरवा सिग्नल दिल्यानंतर रामेश्वर काव यांनी केवळ तीन अधिकाऱ्यांच्या मदतीने काम सुरू केलं. हे ऑपरेशन इतकं सिक्रेट होतं की या चौघांच्या व्यतिरिक्त कुणालाही याची कल्पना नव्हती. 27 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर 16 मे 1975 रोजी सिक्कीमचे भारतात विलिनीकरण करण्यात आलं. या घटनेमुळे अमेरिका आणि चीनला मात्र मोठा धक्का बसला होता. कारण अमेरिकेचे गुप्तचर खातं सिक्कीममध्ये कार्यरत असूनही त्याची जराही कल्पना त्यांना नव्हती. 


Emergency in India 1975 : आणीबाणीचं खापर काव यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न


देशात जनता सरकार आल्यानंतर मोरारजी देसाई (Morarji Desai) पंतप्रधान झाले. त्यांनी आणीबाणीचं खापर हे रॉचे प्रमुख रामेश्वर काव यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर काव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण या प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने सांगितलं की आणीबाणीच्या निर्णयात काव यांचा कोणताही सहभाग नव्हता. 


रामेश्वर काव यांनी जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पंतप्रधानांसोबत काम केलं. त्यांच्यासोबत काम केलेले रॉचे माजी अधिकारी आर. के. यादव यांनी काव यांच्या जीवनावर आधारित  'मिशन रॉ' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यादव सांगतात की, काव हे गुप्त माहिती गोळा करण्यामध्ये महारथी होते.


पंजाबमध्ये 1980 च्या काळात खलिस्तानी दहशतवाद (Khalistan Terrorism) वाढीस लागला. त्यावेळी काव यांच्या सूचनेनुसार, देशांतर्गत दहशतवाद्यांशी लढण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डची निर्मिती करण्यात आली.


The Kaoboys of the R&AW : गुप्तचरांना काव बॉईज हे नाव कसं पडलं


रामेश्वर काव यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जायची. अमेरिकेचे अध्यक्ष बुश यांनी त्यांना एकदा 'काऊ बॉय'ची एक प्रतिमा भेट दिली. ती प्रतिमा म्हणजे रामेश्वर काव यांचा गौरवच होता. त्यानंतर काव यांनी तशीच एक मोठी प्रतिमा बनवली आणि दिल्लीतील त्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावली. रामेश्वर काव यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्या गुप्तचरांना काव बॉईज ऑफ रॉ (India's Kaoboys) असं म्हटलं जायचं. फ्रान्सच्या तत्कालीन गुप्तचर खात्याच्या प्रमुखांनी 1982 साली एका मुलाखतीत सांगितलं होतं की रामेश्वर काव हे 70 च्या दशकातील जगातील सर्वश्रेष्ठ पाच गुप्तहेरांपैकी एक होते. 


सार्वजिनिक जीवनापासून अलिप्त


रॉ मधून निवृत्त झाल्यानंतर रामेश्वर काव हे दिल्लीतील आपल्या निवासस्थानी राहत होते. त्यांचे निवासस्थान नेमकं कुठं आहे हे अनेकांना माहिती नव्हतं. असंही सांगितलं जातं की रामेश्वर काव हे कसे दिसतात याची माहितीही बहुतेकांना नव्हती. सार्वजनिक जीवनापासून काव हे नेहमीच बाजूला राहिले. आयुष्यात दोन वेळाच या माणसाचा फोटो काढण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. 


भारतीय गुप्तचर संघटनेचा काव यांच्या कार्यकालात दक्षिण आशिया तसेच पश्चिम आशियात दरारा होता, तो आजही आहे. त्या काळात रामेश्वर काव यांच्या 'काव बॉईज' नी जगभर उचापती केल्या, धुमाकुळ घातल्याची चर्चा आजही खुमासदार पद्धतीने सांगण्यात येते. अशा या जगप्रसिद्ध गुप्तचराचा मृत्यू 2002 साली झाला. तरीही ज्या-ज्या वेळी रॉ च्या कर्तृत्वाबद्दल चर्चा होते, त्या-त्या वेळी रामेश्वर नाथ काव यांच्या नावाचीही चर्चा हमखास होते.