नवी दिल्ली : कृषी मालाला चांगला बाजारभाव मिळावा, यासाठी राज्यांनी एपीएमसी बंद करुन ई-नाम या व्यवहार पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेतर्फे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या.


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला योग्य दर मिळणे शक्य होत नाही, असे सीतारामन म्हणाल्या. या यंत्रणेऐवजी ई-नामकडे अधिक गतीने राज्यांनी वळायला हवे, असेही त्यांनी सांगितले. आठवडा, दोन आठवड्यात देशातील जवळपास 7500 कृषी बाजार समिती ई-नामला जोडण्याची मोदी सरकारची योजना आहे. परिणामी अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यासारखा ऑनलाईन प्लटफॉर्म शेतकऱ्यांना मिळणार आहे.

काय आहे ई-नाम तंत्रज्ञान?
शेतमाल विक्री व्यवस्थेमधील पारंपरिक पद्धती बंद करुन संगणकीकृत आणि ऑनलाइन लिलावाद्वारे व्यवहार करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यासाठी ई-नाम(इलेक्ट्रॅानिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट)हे एक व्यापार पोर्टल www.enam.gov.in निर्माण करण्यात आले आहे. याद्वारे देशातील बाजार समित्या व त्यांचे व्यवहार इंटरनेटद्वारे राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यात आलेले आहे.

संबंधित बातम्या -

अवकाळी पावसामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले

यंदा हापूसचा दुष्काळ, आवक निम्म्याने घटल्याने दर वाढले

राज्यभरात भाज्या महागल्या, 20-25 टक्क्यांनी दर कडाडले