नवी दिल्ली : यंदाची वार्षिक अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू होणार आहे. आज जम्मूमध्ये श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे वार्षिक अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. पण, यावर्षी 28 जूनपासून ही यात्रा सुरू होणार आहे. श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने जाहीर केलेल्या कोविड 19 नियमवालीनुसार यात्रा पार पडणार आहे. 56 दिवस चालणाऱ्या या यात्रेची नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. 


श्री अमरनाख श्राईन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीश्वर कुमार म्हणाले, दोन्ही मार्गांसाठीची नोंदणी देशातील 446 बँकातील शाखांच्या माध्यमातून 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये पंजाब नॅशनल बँक (316),  जम्मू काश्मीर बँक (90) आणि यस बँकेचा (40) समावेश आहे. 


ही यात्रा 28 जूनपासून सुरू होणार असून 22 ऑगस्टपर्यंत  सुरू राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 13 वर्षांखालील मुले तसेच 75 पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि  सहा आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीच्या गर्भवती महिला यांना यात्रेत सहभागी होता येणार नाही. यात्रेकरूंना ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा बोर्डाने दिली आहे. वेबसाईटवर राज्यनिहाय बँक शाखांची माहिती आणि यात्रेचा अर्ज उपलब्ध आहे. नोंदणी करताना यात्रेकरुंना आरोग्य दाखला जोडणे बंधनकारक आहे. 


 विशेष म्हणजे, देशभरातून भाविक वर्षभर अमरनाथ यात्रेच्या प्रतीक्षेत असतात. श्री अमरनाथ श्राईन बोर्ड भाविकांसाठी ही यात्रा सुलभ होण्यासाठी व्यवस्था करते.यात्रेकरुंच्या मुक्काम आणि खाण्यापासून बसेसची व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर या प्रवासाच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. या यात्रेचा जम्मू-काश्मीरच्या व्यवसायावरही प्रभाव पडतो. व्यापाऱ्यांना या यात्रेकडून मोठ्या आशा आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती.  जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात.


अमरनाथ यात्रेचं महत्त्व


हिंदू भाविकांच्या पवित्र स्थानांपैकी एक म्हणजे अमरनाथ होय. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग परिसरातील बालाटल क्षेत्रात अमरनाथ गुहा आहे. या गुहेत बर्फाचं शिवलिंग असतं आणि ते थंडीच्या वातावरणातच आकार घेतं. आषाढ पौर्णिमा ते रक्षाबंधन-नारळी पौर्णिमेपर्यंत हे शिवलिंग पूर्ण आकार घेतं. त्यामुळे या काळात शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.


अमरनाथ गुहेची अख्यायिका


भगवान शंकराने याच गुहेत आपलं अस्तित्व आणि अमरत्वाबाबतचं रहस्य पार्वतीला सांगितल्याची अख्यायिका आहे. या गुहेचा उल्लेख काश्मीरी इतिहासकार कल्हण यांनी 12व्या शतकात रचलेलं महाकाव्य 'राजतरंगिणी'तमध्येही आहे. या गुहेच्या छतातून थेंब थेंब पाणी गळतं तेच पाणी गोठून एक विशालकाय रुप धारण करतं. याचा आकार शिवलिंगाप्रमाणे असतो, त्यामुळे हिंदू भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात.