मुंबई  : रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘नॅनो’ गाडीचा प्रवास थांबण्याची शक्यता आहे. कारण जून महिन्यात ‘टाटा नॅनो’ कंपनीच्या अवघ्या तीन गाड्या विकल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट बंद पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.


 टाटा मोटर्सने जून महिन्यात ‘नॅनो’च्या केवळ एका युनिटचे उत्पादन केले, तर अवघ्या तीन गाड्यांची भारतात विक्री होऊ शकली. तसंच ‘नॅनो’ची निर्यात झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे कंपनीचे शेअर्सही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

मागच्या वर्षीही ‘नॅनो’च्या फक्त 167 गाड्यांची विक्री झाली होती.

“नॅनो चे उत्पादन कमी झाल्याची आम्हाला जाणीव आहे, परंतु गाडीचे उत्पादन बंद करण्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही,”असं नॅनोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

सर्वसामान्यांचं चारचाकी गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं, यासाठी रतन टाटांनी 2007 साली ‘नॅनो’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लॉन्च केला होता. ‘सर्वात स्वस्त चारचाकी गाडी’ अशी ‘नॅनो’ची जाहिरात केली होती. परंतु ‘स्वस्त गाडी’ अशी ‘नॅनो’ची जाहिरात करण्याचा आमचा निर्णय चुकीचा होता,असं 2013 साली रतन टाटा यांनी मान्य केलं होतं.

सुरुवातीपासूनच या गाडीला ग्राहकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. गरीबांची गाडी असा शिक्का बसल्यामुळे ‘टाटा नॅनो’ला मोठा फटका बसला.