नागपूर : बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रामदास आठवले यांनी आता एक अफलातून मागणी केली आहे. त्यांनी क्रिकेटसह विविध खेळांमध्ये जातीच्या आधारे 25 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे.


केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आज एका कार्यक्रमानिमित्त नागपूरात आले होते. त्यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट संघात अनुसूचित जातींसाठी २५ टक्के आरक्षण दिलं जावं, अशी मागणी केली. शासकीय नोकरीत आरक्षण असताना क्रीडा क्षेत्रात का नको? असा त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पाकिस्तानकडून झालेला पराभव संशयास्पद असल्याचा दावाही आठवलेंनी केला आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी अशी मागणीच त्यांनी केली आहे.

या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव करणारा भारतीय संघ शेवटच्या सामन्यात पराभूत झाला, त्यामुळे यामागे मॅच फिक्सिंग असल्याची शक्यता असल्याचे आठवलेंनी यावेळी व्यक्त केली आहे.