Jaigarh Fort : गड-किल्ल्यांना आपल्याकडे अनन्यसाधारण असं महत्व आहे. इतिहासाची साक्ष आज हे गड-किल्ले देतात. कित्तेक वर्षांपासूनचे हे गड-किल्ले आजही आपले अस्तित्व कायम ठेवून आहेत. परंतु, यातील काही किल्ले आजही चर्चेचा विषय आहेत. त्यातीलच एक किल्ला म्हणजे राजस्थानमधील जयगड किल्ला. या जयगड किल्ल्यावर कुबेराचा अफाट खजिना सापडला होता असे आजही म्हटले जाते. या अमाप खजिन्यामुळेच आज देखील हा किल्ला नेहमी चर्चेत असतो. परंतु, खरचं या किल्ल्यावर खजिना होता की फक्त अफवा होत्या? याबाबत अद्यापही कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

  


तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने 1976 मध्ये दिल्ली-जयपूर हायवे सामान्य लोकांसाठी बंद करून दिल्ली आणि जयपूरमधील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली होती. त्यावेळी संपूर्ण देशभरात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामुळे याबाबतची बातमी पसरायला वेळ लागला. परंतु, जयपूर-दिल्लीत त्यावेळी चर्चा रंगली ती जयगढ किल्ल्यात सुरु असलेल्या खोदकामात कुबेराचा अफाट-अमाप खजिना सापडला असून आर्मीचे ट्रक तो खजिना घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत याची. परंतु, खरच हा खजिना होता का? आणि होता तर तो कोणाचा आणि आणला कुठून आणि कुणी??  या सर्वांची उत्तरं  तिलिस्मात-ए-अम्बेरी या पुस्तकात होती. यामध्ये लिहिलं होतं की, जयगढच्या किल्ल्यात सात टाक्यांमध्ये अमाप संपत्ती दडलेली आहे. 


पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आदेशाने खोदकामाला सुरूवात  
राजस्थानमध्ये जयपूरच्या जयगढ किल्ल्यात सात टाक्यांमध्ये खजिना लपविला गेल्याचं समोर आल्यानंतर 1976 ला किल्ल्याच्या खोदकामाला सुरुवात झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशाने या खोदकामाला सुरूवात करण्यात आली. याला आणखी एक पार्शभूमी होती. जयपूर राजघराण्याची महाराणी गायत्री देवी हीच्याशी इंदिरा गांधी यांचं बिलकुल जमत नसे, अगदी शाळेपासूनच दोघी एकमेकींचा द्वेष करत होत्या, असं म्हटलं जात होतं. 


कोण होत्या गायत्री देवी?
गायत्री देवी यांनी 1962 मध्ये जयपूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवाराचा रेकाँर्ड ब्रेक पराभव केला होता. दोन लाख 46 हजार मतांपैकी एक लाख  93  हजार मतं गायत्री देवी यांना मिळाली होती. गायत्री देवी यांच्या या विक्रमाची नोंद  गिनिज वर्ल्ड रेकाँर्ड बुकमध्ये झाली.  आणीबाणीच्या दरम्यान इंदिरा गांधी यांच्या आदेशाने गायत्री देवी आणि जयपूरच्या राजघराण्यावर आयकर विभागाचा छापा टाकला. यांतर गायत्री देवींना सहा महिने तुरुंगात राहावं लागलं. त्यावेळी जगात दहा सुंदर महिलांमध्ये गणली जाणारी जयपूरची महाराणी तिहार जेलमध्ये कैद झाली होती. इकडे जयगढ किल्ल्याच्या खोदकामासाठी भारतीय सैन्याच्या तुकडीला बोलावलं गेलं. खोदकाम सुरु झालं, किल्ल्यांने कित्येक दशकांनंतर पुन्हा पहारा पाहिला. सामान्य माणसाला किल्ल्याच्या आस-पास फिरकण्याचीही बंदी केली गेली होती. पाच महिने काम सुरु होतं याच दरम्यान कित्येकदा खजिना सापडल्याच्या वावड्या उठल्या.


खोदकाम सुरू असतानाच एकदा इंदिरा गांधी यांचे पूत्र संजय गांधी यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी तर खजिना नक्कीच सापडला अशी बातमी देशभर पसरली. कित्येक दिवस सुरु असलेल्या खोदकामामुळे किल्ला उध्वस्त स्थितीत पोहोचला होता. याच दरम्यान पाकिस्तानातून भाराताला एक पत्र आलं. पाकचे त्यावेळचे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांनी इंदिरा गांधी यांना हे पक्ष लिहिलं होतं. खजिन्यासाठी  जयपूरच्या जयगढ किल्ल्याचं खोदकाम सुरु असून तो खजिना मिळाल्यांतर त्यातील हिस्सा पाकिस्तानलाही मिळावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती.  यावर इंदिरा गांधी यांनी लगेच उत्तर दिले नाही. पाच महिन्यांनंतर खोदकाम बंद केले गेले. परंतु, दुसऱ्या दिवशी दिल्ली-जयपूर हायवे सामान्य माणसांसाठी बंद केला गेला. असं म्हणतात की त्या दिवशी आर्मीचे कित्येक ट्रक दिल्लीच्या दिशेने धावत होते आणि सामान्य माणसांना आपला रस्ता बदलावा लागला होता. त्यावेळी अशी चर्चा सुरु होती की या ट्रकमध्ये जयगढ किल्ल्यात सापडलेलं सोनं भरलेलं आहे. पण सरकारकडून मात्र याबाबत काहीही खुलासा केला गेला नाही. जयगढ किल्ल्याच्या खोदकामानंतर फक्त 230 किलो चांदी सापडल्याचं त्यावेळी जाहीर केलं गेलं. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी पाकच्या पंतप्रधानांना उत्तर पाठवलं की, आमच्या कायदेतज्ञांशी चर्चा केल्यानंतर तुमचा कुठलाही हक्क भारतातील अशा प्रकराणांशी संबंधीत असू शकत नाही आणि जयगड किल्ल्यात कुठलाही खजिना सापडला नाही. तर तुम्हाला देऊ कुठून?


अनेक प्रश्न अनुत्तरीत? 
या खोदरकामानंतर अनेक प्रश्नांनी डोकं वर काढलं, ज्याची उत्तरं अद्याप देखील मिळालीच नाहीत.  खजिना खरंच सापडला का?  त्या दिवशी दिल्ली-जयपूर हायवे सामान्यांसाठी का बंद केला गेला?  दिल्ली-जयपूर हायवेवरून धावणाऱ्या ट्रक्समध्ये नक्की काय होतं? पाच महिने खोदकाम केल्यानंतर केवळ 230 किलो चांदीच हाताला लागली तर पाच महिने खोदकाम केलं कशासाठी? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु, अवघा किल्ला खोदून काढण्याची भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही पहिली घटना म्हणावी लागेल. या खोदकामाने अनेक प्रश्न उपस्थित केले आणि अनेक उत्तरं संशयाच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.


कुठून आला होता हा खजिना?
अकबराच्या दरबारात असलेल्या नऊ रत्नांपैकी महाराजा मानसिंह हे शूर, पराक्रमी आणि जबरदस्त व्यक्तीमत्व होतं. जिथे तो तुटून पडले तो प्रदेश जिंकणार अशी ख्याती होती. अकबराने त्यावेळी या महायोध्याशी एक करार केला. जो भू-भाग जिंकला, जे राज्य जिंकलं तेथील राज्य अकबराचं आणि तेथील संपत्ती महाराजा मानसिंहांची, असा हा करार होता. त्यानंतर महाराजा मानसिंह याने अनेक भू-प्रदेशांमधली लक्ष्मी आपली केली आणि भू-भागावर मोगली मोहोर उमटवली. नवरत्नांपैकी एक असलेलं हे रत्न अवघ्या भारतवर्षांत चमकत होतं. भारताबाहेर असलेल्या अफगणीस्थानातील काही शत्रूंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी मग अकबराने मानसिंह राजावर टाकली. कुर्निसात करुन गांधारीच्या माहेरघरी मध्ययुगीन “कौरवांचा” बंदोबस्त करायला महाराजा मानसिंह निघाले. एकेक कबिले परास्त करण्याचा सपाटाच महाराजा मानसिंगाने लावला.  


प्रचंड विजय मिळवत संपत्ती लुटत, मोगली सत्तेचा झेंडा अफगाणिस्तानात फडकत होता, पुढे सरकत होता. अखेर बलाढ्य शत्रूचा नायनाट करत प्रचंड संपत्ती बरोबर घेऊन महाराजा मानसिंह भारतात परत निघाले. घोडे, खेचरांवर कुबेराचा खजिना त्यांनी बरोबर घेतला होता. गांधारीनं लग्नानंतर बरोबर आणलेल्या आपल्या खजिन्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक हा खजिना होता.  आणलेली संपत्ती मग महाराजा मानसिंह यांनी आमेच्या किल्ल्यात सुरक्षित ठेवली. आमेरचा हा किल्ला 1592 ला त्यांनीच बांधून घेतला होता. अनेक वर्षे उलटल्यानंतर महाराजा मानसिंह व्दितीय गादीवर बसला. त्याने 1726 ला आमेर किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी त्याच्या पुढच्या डोंगरावर हा जयगढचा किल्ला बांधला. त्यानंतर दीडशे वर्षे इंग्रजांची भारतावर सत्ता राहिली. त्यानंतर 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला आणि 1976 ला खजिना शोधण्यासाठी या किल्ल्याचे खोदकाम करण्यात आले. परंतु, खोदकामानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे आजही अनुत्तरीतच आहेत.