Rahul Gandhi on Opposition Meeting: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी पाटण्यात वज्रमूठ आवळताना एल्गार केला. विरोधी पक्षांनी या बैठकीनंतर मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. आम्ही एकजूट देशाच्या हितासाठी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषदेत आम्ही समान अजेंडा ठरवत असल्याचे सांगितले. आता 12 जुलै रोजी विरोधी पक्षांची शिमल्यात बैठक होणार आहे. आगामी रणनीतीवर शिमल्यातील बैठकीत चर्चा केली जाईल. आम्हाला 2024 ची लढाई एकजुटीने लढायची असल्याचे खर्गे यांनी नमूद केले. 


राहुल गांधी म्हणाले..


बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, मल्लिकार्जुन खर्गे आणि नितीश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढील बैठकीत ही चर्चा सखोलपणे करू, असे सांगितले. विरोधकांची एकजूट ही एक प्रक्रिया आहे, ती येथून पुढे जाईल. ही विचारधारेची लढाई आहे. काही मतभेद नक्कीच असतील, पण आम्ही एकत्र आहोत. ते पुढे म्हणाले की, भाजप आणि आरएसएस भारताच्या एकात्मतेवर हल्ला करत आहेत. हा विचारधारेचा लढा असून आम्ही एकत्र उभे आहोत. आम्ही एकत्र काम करू आणि आमच्या समान विचारधारेचे रक्षण करू. विरोधी ऐक्याची ही प्रक्रिया आहे जी पुढे जाईल.


काय म्हणाले नितीश कुमार?


बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, काही दिवसांनी सर्व पक्षांसोबत पुढील बैठक होणार आहे. कोण कुठे लढणार याचा निर्णय पुढील बैठकीत होणार आहे. खर्गे यांच्या पुढाकाराने ही बैठक होणार आहे. जे राज्य कारभारात आहेत ते देशहिताचे काम करत नाहीत, ते सगळा इतिहास बदलत आहेत. नितीश कुमार यांनी सांगितले की, आम्ही सर्व विरोधी पक्षांनी ठरवले आहे की, आतापासून एकत्र लढू. भाजप देशाचा इतिहास बदलत आहे. जर ते देश जिंकून परत आले तर ते देशाचे संविधानही बदलतील.


उद्धव ठाकरेंनी ऐक्याचे कारण सांगितले


आमची विचारधारा वेगळी असली तरी देश आमच्यासाठी एक आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देशात हुकूमशाही आणू इच्छिणाऱ्यांना आम्ही विरोध करू, असे ठाकरे म्हणाले. 


काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?


तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पाटण्यापासून जे काही सुरू होते ते जनआंदोलनाचे रूप घेते. भाजप पुन्हा निवडणूक जिंकला तर देशात निवडणूक होणार नाही. त्या म्हणाल्या की, भाजपचे हुकूमशाही सरकार आहे. भाजपला देशाचा इतिहास बदलायचा आहे, पण देशाचा इतिहास जतन होईल याची काळजी घेऊ. 


इतर महत्वाच्या बातम्या