मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपनीत चीनी व्यक्तीची गुंतवणूक आहे, त्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून 1 अब्ज डॉलर्स हे भारताबाहेर गेले आणि नंतर पुन्हा अदानी यांच्या कंपनीत गुंतवण्यात आले असाही आरोप त्यांनी केला. राहुल गांधींनी केलेले हे सर्व आरोप अदानी समूहाने फेटाळले आहेत. त्यांनी या संबंधित एक निवेदन प्रसिद्ध करुन हे आरोप जुनेच असून त्यामध्ये समूहाला क्लीन चिट मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे. 


राहुल गांधी म्हणाले की, अदानी यांच्या कंपनीत काही लोकांनी छुपी गुंतवणूक केली आहे. जवळपास 1 अब्ज डॉलर्स हे अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून बाहेर वेगवेगळ्या देशात गेले आणि नंतर ते परत आले. त्या पैशातूनच आता अदानी हे विमानतळ आणि इतर प्रकल्प राबवत आहेत. हा पैसा कुणाचा आहे? अदानींचा आहे की आणखी कुणाचा?  दुसऱ्या कुणाचा असेल तर ते कोण आहेत याची चौकशी करावी. 


विनोद अदानी हे या मागचे मास्टरमाईंड असून ते गौतम अदानी यांचे बंधू आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, अदानी यांच्या कंपनीमध्ये नासर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग यांची गुतंवणूक आहे. अदानी जर भारतात विकास प्रकल्प राबवतात तर त्यांच्या कंपनीमध्ये चीनी व्यक्तीचा पैसा कसा? अदानींची कंपनी ही संरक्षण क्षेत्रात काम करत आहे, मग चीनी व्यक्तीची गुंवतणूक त्यामध्ये कशी काय? गौतम अदानी यांच्या कंपनीमध्ये दोन व्यक्तींची गुंतवणूक असून ती का आहे याची चौकशी केली पाहिजे. 


अदानी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. तसेच ईडी, सीबीआय हे अदानी यांची चौकशी का करत नाहीत असा सवालही त्यांनी केला. 


हिंडनबर्ग नंतर आता OCCRP या अमेरिकन संस्थेने भारतातील अदानी ग्रुपला पुन्हा लक्ष्य केलं आहे. अदानी समुहाने (Adani Group) आपल्याच शेअर्समध्ये मॉरिशस कनेक्शन वापरुन अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करुन कृत्रिमरित्या आपल्या शेअर्सचे भाव वाढवल्याचा ओसीसीआरपी चा आरोप आहे. आदानी समुहाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 


ही संबंधित बातमी वाचा: