Project Cheetah : भारतात 70 वर्षांनंतर 'चिते की चाल' दिसणार आहे. नामिबियामधून आठ चित्ते आज भारतात दाखल झाले आहेत. नामिबिया येथून विशेष विमानानं आफ्रिकन आठ चित्त्यांचं भारतात आगमन झालं आहे. हे आठ चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहेत. चित्ते नामिबियाहून सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास करुन भारतात दाखल झाले आहेत. 1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली देशात आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर यंदा 2022 मध्ये हा प्रोजेक्ट चित्ता पूर्णत्वास आला आहे. या प्रोजेक्ट चित्ता साठी भारत सरकारने सुमारे 90 ते 92 कोटी खर्च केल्याचं बोललं जात आहे.


प्रोजेक्ट चित्ता



  • नामिबियातून आठ चित्ते आज भारतात आणण्यात आले आहेत. यामध्ये पाच मादी आणि तीन नर आहेत.

  • नामिबियाहून विशेष बोईंग 747-400 विमानानं ग्वालेर, मध्य प्रदेश येथे चित्त्यांचं आगमन झालं आहे.

  • ग्वाल्हेरहून चित्त्यांना हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलं जाईल.

  • सलग 20 तासांत 8,000 किलोमीटरचे अंतर कापून चित्ते भारतात पोहोचले आहेत.

  • नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचं (CCF) एक पथक चित्त्यांसोबत आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चित्ते कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात येतील.

  • चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे


कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय


कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येईल.


चित्त्यांसमोरील आव्हानं


भारतात आणलेल्या चित्त्यांसमोर काही आव्हानं असतील. चित्त्यांना भारतातील वातावरणाशी जुळवून घ्यावं लागेल. चित्त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यांना 12 किलोमीटरच्या विशेष अधिवासात विलगीकरणात म्हणजेच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल. भारतात आढळणारं हरीण आफ्रिकेत आढळतं नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणं चित्त्यांना जमेल का, हा प्रश्न आहे. निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येईल.


1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष 


 भारतातून 1952 मध्ये चित्ता नामशेष झाला. भारतातून नामशेष झालेले चित्ते भारतात आणण्याची तयारी काँग्रेस सरकारच्या काळात सुरु झाली होती. छत्तीसगढमध्ये शेवटच्या चित्याची शिकार झाली होती. 1970 मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इराणहून भारतात चित्ते आणण्याची तयारी सुरु केली होती. आमचे काही वाघ तुम्हाला घ्या, त्या बदल्यात चित्ते आम्हाला द्या अशी ती ऑफर होती. इराणच्या शाहांशी इंदिरा गांधी यांनी करारावर सह्याही केल्या होत्या. पण इराणमध्ये सत्ताबदल झाला, शाहांची राजवट गेलीनंतर हा प्रकल्प बारगळला.


महत्त्वाच्या इतर बातम्या