नवी दिल्ली: राष्ट्रपती निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला आव्हान देऊ शकेल इतपत एकजुट विरोधकांमध्ये आहे की नाही याचा फैसला या निवडणुकीच्या निमित्तानं होईल. पाहुयात कशी रंगणार आहे राष्ट्रपतीपदाची ही निवडणूक


कोण होणार देशाचा नवा राष्ट्रपती... या प्रश्नाचं उत्तर 21 जुलैला मिळणार आहे. निवडणूक आयोगानं आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी कार्यक्रमाची घोषणा केलीय. 18 जुलै रोजी मतदान तर 21 जुलैला मतमोजणी आहे. राष्ट्रपती पद हे घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च पद, देशाचे प्रथम नागरिक. या पदासाठी यावेळी मोदींची निवड काय असणार याची उत्सुकता असेल. 


राष्ट्रपती पदावर उत्तर भारतीय, तर उपराष्ट्रपतीपदावर दक्षिण भारतीय अशी सध्याची व्यवस्था भाजपनं केली होती. मोदी-शाहांची कार्यपद्धती पाहता ते या दोन्ही पदासाठी दुसरी संधी त्याच व्यक्तींना देतील अशी शक्यता नाही. यावेळी दलित, आदिवासी की महिला उमेदवारांना संधी मिळणार याची उत्सुकता असेल. 


मागच्या वेळी रामनाथ कोविंद यांचं नाव कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. त्याचवेळी अचानक बिहारच्या राज्यपालपदावरुन त्यांची थेट राष्ट्रपती म्हणून निवड झाली. आता यावेळी कुठलं धक्कातंत्र मोदी वापरतात हे पाहणं महत्वाचं असेल.


कशी होते राष्ट्रपती पदाची निवडणूक?



  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार मतदान करतात.

  • प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य हे 700 इतकं असेल.

  • प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य हे त्या राज्यातल्या लोकसंख्येच्या आधारावर ठरतं, त्यासाठी 1971 च्या जणगणनेचा आधार घेतला जातो.

  • महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य हे 175 आहे.

  • देशातल्या एकूण मतांची किंमत होते 10 लाख 86 हजार 431. यापैकी ज्या उमेदवाराला 5 लाख 43 हजार 216 मतं मिळतात तो विजयी ठरतो.


भाजपला आव्हान देण्याची विरोधकांना संधी
भाजपला आव्हान देण्याची संधी 2024 च्या निवडणुकीआधी, या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधकांना मिळणार आहे. कारण मागच्या वेळी देशात जितके आमदार भाजपचे होते, त्यात काहीशी घट झालेली आहे. राज्यसभेचे खासदार भाजपचे वाढले असले तरी शिवसेना, तेलंगणा राष्ट्र समिती, अकाली दलासारखे पक्ष आता भाजपसोबत नाहीत. त्यामुळे मित्रपक्षांची नव्यानं जुळणी भाजपला करावी लागणार आहे. 


भाजपला टक्कर देण्यासाठी इतर पक्षांची एकजुट हवी असेल तर काँग्रेसनं आपला उमेदवार देण्याचा हट्ट सोडावा अशी चर्चा विरोधकांत आहे. मागच्या वेळी काँग्रेसनं मीरा कुमार यांना रिंगणात उतरवलं होतं. तर दुसरीकडे भाजपला आपल्या मित्रपक्षांच्या जुळणीची सुरुवात बिहारमध्ये नीतीश कुमारांपासून करावी लागणार आहे. शिवाय वायएसआर, बीजेडीसारखे काठावरचे पक्ष याही वेळी भाजपला सोबत करणार का हे पाहावं लागेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी एनडीए विरुद्ध यूपीए या लढतीची झलक या निमित्तानं पाहायला मिळणार आहे.