नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झालं आहे. तब्बल 14 विरोधी पक्षांना एकत्र आणून रामनाथ कोविंद यांना टक्कर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न फुटीमुळे निष्प्रभ ठरण्याची चिन्हं आहेत. कारण प्रत्यक्ष मतदानावेळी उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि महाराष्ट्रातील अनेक आमदार, खासदारांनी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केलं.


राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या मीरा कुमार यांच्यात लढत असून, एनडीएचं पारडं जड आहे.

20 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा निकाल जाहीर होईल. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील.

यूपीत शिवपाल गटाचं कोविंद यांना मतदान

उत्तर प्रदेशातील सपाचे नेते आणि अखिलेश यादव यांचे विरोधक शिवपाल यादव यांच्या गटाचा समावेश आहे.

त्रिपुरात ‘तृणमूल’ गटाने ममतांचा आदेश डावळला!

त्रिपुरातील तृणमूल काँग्रेसच्या गटानेही ममतांचा आदेश डावलून थेट कोविंद यांच्या बाजूने आपलं वजन टाकलं. तर महाराष्ट्रात तुरुंगाची हवा खाणारे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनीही कोविंद यांना मतदान केलं.

776 खासदार आणि 4 हजार 120 आमदारांच्या एकूण मतांचं मूल्य 10 लाख 98 हजार 882 इतकं आहे आणि विजयासाठी कोविंद यांना फक्त 5 लाख 49 हजार 442 मतं गरजेची आहेत. त्यामुळे आता विक्रमी मतदानासह कोविंद जिंकतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातही मतदानाचा उत्साह

महाराष्ट्रातही राष्ट्रपतीपदासाठी मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. आज विधीमंडळात 288 पैकी तब्बल 287 आमदारांनी आपला हक्क बजावला. तर बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर परदेशात असल्यानं ते मतदान करु शकले नाहीत.

भुजबळ आणि रमेश कदमांचंही मतदान

आजच्या ऐतिहासिक निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या आरोपात आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोघांनीही मतदान केलं. त्यांना कोर्टाने 1 तासाची खास मुभा दिली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ यांना अँब्युलन्समधून विधीमंडळ परिसरात आणण्यात आलं. यावेळी त्यांना चालतानाही त्रास होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. तर रमेश कदम यांना पोलिसांच्या गाडीतून मतदानासाठी आणण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना कदम यांनी आपण भाजपला मतदान केल्याचं सांगितलं.

कोण आहेत रामनाथ कोविंद?

  • रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी जन्म.

  • कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतच शिक्षण

  • 1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली.

  • 1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती

  • भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहिलं

  • भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष

  • 8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत


कोण आहेत मीरा कुमार ?

  • मीरा कुमार 1973 मध्ये भारतीय विदेश सेवेत रुजू

  • माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या.

  • 1985 मध्ये राजकीय कारकीर्द सुरु, लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा खासदारपदी

  • 1990 मध्ये काँग्रेसच्या कार्यकारणी समिती सदस्य होत्या

  • 1996 आणि 1998 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत विजयी

  • 2004 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सामाजिक न्याय मंत्री पदाची सुत्रे

  • 2009 मध्ये लोकसभा अध्यक्षा. देशाच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा.