नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूकीत कुणाला साथ द्यावी, हे ठरवण्यासाठी प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक कार्यक्रम जाहीर केला आहे. लोकांच्या मतदानातूनच प्रशांत किशोर याबाबत निर्णय घेणार आहेत.


जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी प्रशांत किशोर यांच्या संस्थेने 11 जुलैपासून मतदान घेण्यास सुरुवात केली आहे. या निकालाची 15 ऑगस्टला घोषणा केली जाणार आहे. ज्या नेत्याला सर्वात जास्त मत मिळतील त्या नेत्यासाठी प्रशांत किशोर 2019 मधील लोकसभा निवडणूकीत काम करणार आहेत.

महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी गांधीजींच्या 18 सूत्री कार्यक्रमातून एक मोहीम सुरु केली आहे. ज्यामध्ये सार्वजनिक सद्भाव, स्वच्छता, दारुबंदी, आरोग्य, शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.

‘नॅशनल अजेंडा फोरम’ असं या मोहिमेला नाव देण्यात आलं आहे. देशातील सुमारे 15 हजार तरुणांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. गांधीजींच्या 18 सूत्री कार्यक्रमाच्या कसोटीवर ज्या नेत्याला सर्वाधिक मते मिळतील, त्या नेत्याला प्रशांत किशोर यांच्या फोरमचा पाठिंबा मिळणार आहे.

प्रशांत किशोर यांची कारकीर्द

निवडणूकीत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी  ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसाठी काम केलं आहे.

प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं.  ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार...’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या.

बिहार विधानसभा निवडणूकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता.

यानंतर पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणूकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केले होते.