नवी दिल्ली :  दिल्लीच्या बुराडीमधील 11 जणांचा मृत्यू फाशीमुळेच झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. बुराडीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह घरात आढळल्याने खळबळ माजली होती.


बुराडीतील 11 पैकी दहा जणांचे मृतदेह लटकलेल्या परिस्थितीत तर कुटुंबप्रमुख नारायणी देवी यांचा मृतदेह घरातील दुसऱ्या खोलीतील बेडवर आढळला होता. यामुळे नारायण देवी यांची हत्या झाल्याची शंका निर्माण झाली होती.

पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, नारायणी देवी यांचाही मृत्यू फाशी लागूनच झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील 11 पैकी 11 जणांचा मृत्यू फाशी लागूनच झाला, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

याआधी 9 जुलैला 11 पैकी सहा जणांचा मृत्यू फाशीमुळे झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली होती. या 11 जणांचा मृत्यू तांत्रिक थेअरीमुळे झाल्याचा अंदाज लावण्यात येत होता. पण या प्रकरणात तांत्रिकाची भूमिका नसल्याचं 9 जुलैलाच पोलिसांनी सांगितलं होतं.

दरम्यान, या प्रकरणातील मृत्यूंचं गुढ उकलण्यासाठी त्यांचं  मनोवैज्ञानिक पोस्टमार्टम दिल्ली पोलिसकडून करण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. मनोवैज्ञानिक पोस्टमार्टमद्वारे, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यातील तथ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो.