Congress : आगामी लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी गुरुवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. आज कॉंग्रेस पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) वायनाडमधून पुन्हा निवडणूक लढवणार यावर एकमत झाले आहे. प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) रायबरेलीतून निवडणूक लढवणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर नेते उपस्थित होते.


 


काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करणार


केरळमध्ये पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीने वायनाड मतदारसंघासाठी राहुल गांधींचे नाव सुचवले आहे. सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी वायनाडमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, राहुल गांधी वायनाडशिवाय अमेठीच्या त्यांच्या जुन्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने सांगितले की, कॉंग्रेस केरळमध्ये 16 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर मित्रपक्ष चार जागांवर निवडणूक लढवणार आहेत. तर, सीईसीने 16 जागांसाठी कोण उमेदवार असतील हे ठरविण्यात आले असून एआयसीसी आज उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे.


 


मल्लिकार्जुन खरगे यांच्या जावईचेही नाव शर्यतीत


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने (CEC) 40 उमेदवारांची नावे निश्चित केली. या यादीत राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. मात्र, राहुल आपल्या पारंपरिक मतदारसंघातून अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही यावर सस्पेन्स कायम आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जावईचेही नाव निवडणुकीच्या शर्यतीत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीईसी बैठकीत 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 60 लोकसभा जागांवर चर्चा झाली. यामध्ये दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, तेलंगणा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि लक्षद्वीपच्या लोकसभेच्या जागांचा समावेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपाल यांचाही उमेदवारांच्या यादीत समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्नाटकात 4-5 जागांवर एकमत होऊ शकले नाही. येथे अंतिम निर्णय सर्वोच्च नेतृत्वाला घ्यायचा आहे.


 


गुलबर्गा जागेवर चर्चा


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गुलबर्गा जागेवर चर्चा झाली नाही. मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी हे देखील या निवडणुकीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. खरगे यांनी स्वत: या जागेवरून दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. खरगे हे राज्यसभा सदस्य असून त्यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील चितापूर विधानसभा मतदारसंघातून खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खरगे हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकले आहेत. प्रियांक कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. खरगे यांचे जावई दोड्डामणी यांना तिकीट मिळाल्यास ते निवडणुकीच्या राजकारणात उतरतील.


 


प्रियांका गांधींबाबत सस्पेन्स


दरम्यान, प्रियांका गांधी यांच्या निवडणुकीच्या राजकारणावरही सस्पेंस आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी वढेरा रायबरेलीतून निवडणूक लढवू शकतात,  ही जागा यापूर्वी सोनिया गांधी यांच्याकडे होती. मात्र सोनियांच्या राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्यानंतर पक्षाला या जागेवर नवा उमेदवार उभा करायचा आहे. अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जागा गांधी घराण्याचा गड मानल्या जातात. गांधी घराण्यातील सदस्याने तेथून निवडणूक लढवावी, अशी मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केली आहे. 2019 मध्ये अमेठी मतदारसंघातून राहुल गांधींचा पराभव झाला होता. मात्र, केरळमधील वायनाडमधून ते विजयी झाले. राहुल यापूर्वी तीन वेळा अमेठीतून खासदार झाले आहेत.


 


'भूपेश बघेलही निवडणूक लढवणार'


तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर पुन्हा या जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमधून माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून, ताम्रध्वज साहू यांना दुर्ग महासमुंदमधून, ज्योत्स्ना महंत यांना कोरबामधून, शिव देहरिया यांना जांजगीर-चंपा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. तर छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव निवडणूक लढवणार नाहीत.