नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सर्वच राज्य सरकारांकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. कोरोनासंदर्भात पंतप्रधान मोदी वेळोवेळी देशवासियांचा संबोधित करत असतात. आज देखील ते या विषयासंदर्भात एक व्हिडीओ संदेश प्रसारित करणार आहेत.


पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी एक ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता देशवासियांसाठी एक व्हिडीओ संदेश प्रसारित करणार आहे,  असं यात त्यांनी म्हटलं आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आता नेमकी काय भूमिका घेणार? याकडे देशाचं लक्ष लागले आहे.

सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आहे. देशात अडीच हजाराहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. तर 50 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचं संकट हे युद्धापेक्षा मोठं असल्याचंही म्हटलं होतं. आता आज, शुक्रवारी सकाळी 9 वाजता ते काय संदेश देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.


पंतप्रधान मोदी यांनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं? याच्या सूचना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये दिलेल्या सूचना :

  1. लॉकडाऊन संपविल्यानंतर 15 एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती भाग सुरु होतील हे पाहावे.

  2. देशात आत्तापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होत आहेत असे दिसते पण खऱ्या अर्थाने आत्ता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे संकट टळले नाही. आपल्याला सोशल डिस्टनसिंग किंवा सामाजिक अंतर राखायचे आहे. त्यासाठी मास्क वापरले पाहिजे किंवा घरगुती स्वच्छ कपड्याचा मास्क म्हणून उपयोग करू शकतो. 21 दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.

  3. कोरोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन वगैरे तंत्रज्ञानांचा उपयोग करा.

  4. कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर करीत नाहीत. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या.

  5. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती, तज्ज्ञ यांचे टास्क फोर्स तयार करा. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या.

  6. लोकप्रियता मिळविण्यासाठी उगाच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्यावयाचा आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रांत प्रसिद्धी मिळेल पण कोरोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.

  7. ग्रामीण भागत अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल . पण एकदम गर्दी होईल असे करू नका. त्याची विभागणी करा. शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही.

  8. पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होत आहे. तशी गर्दी होऊ न देता नियोजन करा.

  9. 11 हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत.

  10. आयुष मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा.

  11. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळत आहेत .आपणही काळजी घेतली पाहिजे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.