नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत लोकसभा निवडणूकीपूर्वीचे शेवटचे भाषण केले. या भाषणात त्यांनी गेल्या साडेचार वर्षात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मोदींनी काँग्रेसच्या कार्यकाळातल्या महागाईवरुन काँग्रेसला लक्ष्य केले.


मोदी यांनी "बाकी कुछ बचा नहीं महंगाई मार गयी", "महंगाई डायन खायें जात है" ही दोन गाणी कोणाच्या कार्यकाळात प्रसिद्ध झाली? असा सवाल संसदेसमोर विचारला. मोदी म्हणाले की, "काँग्रेसच्या कार्यकाळात देशात इतकी महागाई होती. लोक अशा प्रकारची गाणी म्हणून महागाईची समस्या मांडत होते."

मोदी म्हणाले की, "इंदिरा गांधी यांचे सरकार होते तेव्हा "बाकी कुछ बचा नहीं महंगाई मार गयी" हे गाणे प्रसिद्ध झाले होते. तर यूपीएच्या रिमोट कंट्रोलच्या सरकारच्या (मनमोहन सिंग)कार्यकाळात "महंगाई डायन खायें जात है" हे गाणे प्रसिद्ध झाले होते. महागाई आणि काँग्रेस यांचे अत्यंत जवळचे नाते आहे."

मोदी म्हणाले की, "जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होते तेव्हा देशात मोठ्या प्रमाणावर महागाई होती, परंतु गेल्या साडेचार वर्षांपासून महागाईचा दर केवळ 4 टक्के इतका स्थिर आहे, मध्यमवर्गीयांना आमच्या सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. याउलट काँग्रेसच्या कार्यकाळात मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले होते.